मलकानगिरी – ओडिशाच्या मलकांगिरी जिल्ह्यात पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून अपहरण करण्यात आलेल्या तीन गावकऱ्यांपैकी एक गावकऱ्याची माओवाद्यांनी हत्या केली आहे. गावकऱ्यांकडून मिळलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षादलांच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी माओवाद्यांनी पेरून ठेवलेले सात आयईडी मंगळवारी निकामी करण्यात आले होते. यामुळे मोठी दुर्घटना टळली या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी गावकऱ्याची हत्या करण्यात आली आहे.
मलकांगिरीतील ओडिशा-आंध्र प्रदेशच्या सीमेवरील स्वाभिमान आंचल या भागात ही घटना घडली आहे. स्वाभिमान अंचल या भागात कधी माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव होता. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमधील बहुसंख्य माओवादी लपण्यासाठी या भागात येत असत. मात्र सुरक्षादलांनी या भागात माओवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र केल्याने माओवाद्यांच्या कारवायांमध्ये घट झाली आहे.
याचबरोबार सरकारने या भागात विकासकामांना देखील वेग दिला आहे. काही महिन्यापूर्वीच या भागात प्रथमच बस सेवा सुरु करण्यात आली. याचबरोबर रस्ते उभारण्यास अन्य पायाभूत सिविधा हाती घेण्यात आल्या आहेत. मात्र माओवाद्यांकडून विकास प्रकल्पांना लक्ष्य करण्यात येत असून अडथळे आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. कित्येक वर्ष हा भाग इतर भागांपासून तुटलेला होता. मात्र २०१८ मध्ये गुरुप्रिया ब्रिज तयार झाल्यानंतर या भागाचा अन्य भागाशी संपर्क होऊ शकला.
सुरक्षदलांची कारवाई आणि या भागात हाती घेण्यात आलेल्या विकासकामांमुळे माओवादी अस्वस्थ झाले असून आपले वर्चस्व टिकवण्यासाठी सुरक्षादलांच्या जवानांना लक्ष्य करत आहेत. त्यासाठीच माओवाद्यांनी हे आयईडी पेरले होते असे सांगण्यात येते. आयईडी जप्त केल्याच्या दुसऱ्याच दिवशी माओवाद्यांनी गावकऱ्याची हत्या केली.
मंगळवारी रात्री उशिरा सुमारे १५ सशस्त्र माओवाद्यांनी ‘स्वाभिमान अंचल’ मधील जोडंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खजुरीगुडा गावच्या तीन गावकऱ्यांचे अपहरण केले. पोलिसांचे खबरी असल्याचे सांगत या तिघांचे अपहरण करण्यात आले. माओवादी या तिघांना गावाच्या बाहेर घेउन गेले व तिघांना काठी व लोखंडी रॉडने मारहाण केली.
या मारहाणीमध्ये तिघे गंभीर जखमी झाले. तीन ग्रामस्थांपैकी दासू खेमूडू याचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाला. अन्य दोन गावकरी गावात परतण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनांसाठी धाव घेऊन दासू याचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पुढील तपस सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.