सुदानमधील गृहयुद्धात 512 जणांचा बळी

- रविवारी संघर्षबंदीची वाढविलेली मुदतही संपणार - अन्न, पाणी, वीज व इंधनाचे संकट तीव्र होणार

512 जणांचा बळीखार्तूम – सुदानमधील संघर्षाची व्याप्ती वाढू लागली असून आत्तापर्यंत 512 जणांचा बळी गेला आहे. तर 14 दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षात 4200 जण जखमी झाले आहेत. गेले आठवडाभर अमेरिका, सौदी अरेबिया, आफ्रिकन महासंघ आणि संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थी करून संघर्षबंदी लागू केली होती. पण रविवारी ही मुदत देखील संपुष्टात येणार असून त्यानंतर सुदानमधील संघर्ष वाढेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर या संघर्षामुळे सुदानमध्ये अन्न, पाणी, वीज व इंधनाचे संकट अधिकच तीव्र होणार असल्याचा दावा केला जातो. या पार्श्वभूमीवर, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी हा संघर्ष रोखण्याचे आवाहन केले आहे.

512 जणांचा बळीसुदानचे लष्करप्रमुख जनरल बुरहान आणि निमलष्करीदलाचे प्रमुख जनरल दागालो यांनी गेल्या आठवडाभरात दोनहून अधिक वेळा संघर्षबंदीची मुदत वाढविली आहे. पण दोन्ही गटांकडून सातत्याने संघर्षबंदीचे उल्लंघन सुरू आहे. जनरल दागालो यांचे जवान राजधानी खार्तूम ताब्यात घेण्यासाठी रणगाडे तसेच रॉकेट लाँचर्सचा वापर करीत आहेत. त्यामुळे संघर्षबंदीनंतरही राजधानी खार्तूम अस्थैर्याचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत खार्तूममध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांची सुटका करणे अवघड बनले आहे.

तर जनरल बुरहान यांच्या नेतृत्वाखाली लष्कराची लढाऊ विमाने आणि ड्रोन्स निमलष्करीदलाच्या इतर ठिकाणांवर जोरदार हल्ले चढवित आहेत. निमलष्करीदल सुदानला नष्ट करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप जनरल बुरहान यांनी केला. तर लष्करप्रमुख बुरहान देशद्रोही असून त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याचा ठपका निमलष्करीदलाच्या प्रमुखांनी ठेवला. येत्या रविवारी मध्यरात्रीनंतर सुदानमधील संघर्षबंदीची नवी मुदत पूर्ण होत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा हे दोन्ही गट उघडपणे समोरासमोर येतील व सुदानमध्ये गृहयुद्धाचा भडका उडेल, असा दावा केला जातो.

512 जणांचा बळीराजधानी खार्तूमसह दर्फूर या भागातही गृहयुद्धामुळे मोठ्या संख्येने जीवितहानी झाली आहे. दर्फूरमध्येच किमान 96 जणांचा बळी गेला असून ही संख्या वाढण्याची भीती संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या संघर्षाचा फायदा घेऊन सुदानमधील किमान आठ कारागृहातील कैदी पसार झाले आहेत. यामध्ये सुदानचे माजी हुकूमशहा ओमर अल-बशिर यांचा देखील समावेश असल्याची बातमी दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे येत्या काळात दोन गटांमधील या संघर्षात इतर काही गटही सहभागी होतील, असा संशय व्यक्त केला जात आहे.

सुदानच्या दोन्ही गटांमधील या संघर्षाचे परिणाम सुदानी तसेच परदेशी जनतेलाही भोगावे लागत आहेत. आत्तापर्यंत 75 हजार सुदानी नागरिक विस्थापित झाले असून त्यांनी इजिप्त, इथिओपिया, चाड आणि दक्षिण सुदान या शेजारी देशांमध्ये आश्रय घेतला आहे. लष्कर व निमलष्करीदलांनी हा संघर्ष थांबवावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने केले आहे. पण सुदानमधील दोन्ही गट संघर्षबंदी करण्यास तयार नसल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, सुदानमधील या संघर्षाचा अप्रत्यक्ष फायदा चीनला मिळत असल्याचा दावा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून अमेरिका व पाश्चिमात्य देशांची सुदानवरील पकड ढिली पडत चालली आहे. याचा फायदा घेऊन चीन सुदानमध्ये असलेल्या आपल्या प्रभावात वृद्धी करील, असा दावा केला जातो. येथील इंधन व सोन्याच्या खाणींवर चीन आपली पकड जमवू शकतो, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

leave a reply