पाकिस्तानातील अस्थैर्याचा भारत फायदा उचलत आहे

- पाकिस्तानच्या संसद सदस्यांचा दावा

इस्लामाबाद – पाकिस्तानात राजकीय अस्थैर्य माजलेले आहे. भारताबाबतचे धोरण निश्चित करताना पाकिस्तानमध्ये गोंधळ उडालेला आहे. याचा पुरेपूर फायदा भारताने उचलला आहे. जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 मागे घेणे व त्यानंतर पाकिस्तानला सिंधू जलवाटप करारावरून इशारा देणे, हे सारे भारताच्या पाकिस्तानविषयक बदललेल्या धोरणांचे संकेत देत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील राजकीय अस्थैर्य दूर करण्यासाठी व्यापक राजकीय संवाद सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे, असा दावा पाकिस्तानचे संसद सदस्य मुशाहिद हुसैन यांनी केला.

पाकिस्तानातील अस्थैर्याचा भारत फायदा उचलत आहे - पाकिस्तानच्या संसद सदस्यांचा दावासिंधू जलवाटप करारावरून भारताने पाकिस्तानला नोटीस बजावली होती. सहा दशकांपूर्वी केलेल्या या कराराचा फेरआढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगून भारताने पाकिस्तानला यावरून समज दिली होती. पाकिस्तानच्या संसदेत यावर चर्चा पार पडली. या चर्चेत बोलताना मुशाहिद हुसैन यांनी भारताचे पाकिस्तानविषयक धोरण बदलत असल्याचा दावा केला. बालाकोटवर हवाई हल्ला चढवून भारताने 1971 सालानंतर पहिल्यांदाच अशारितीने पाकिस्तानला लक्ष्य केले. त्यानंतर जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवून भारताने या भूभागावरील पाकिस्तानचा दावा निकालात काढला. भारताच्या पाकिस्तानविषयक धोरणात झालेला हा आक्रमक बदल, पाकिस्तानच्या अंतर्गत घडामोडींशी निगडीत आहे, असा दावा मुशाहिद हुसैन यांनी केला.

पाकिस्तानच्या आधीच्या सरकार व लष्करी नेतृत्त्वाने भारताची आक्रमक धोरणे लक्षात न घेता भारताशी चर्चा करण्याची तयारी दाखविली होती. त्यामुळे एलओसीवर संघर्षबंदी झाली. याला भारत तयार झाला कारण भारताला एकाच वेळी पाकिस्तान व चीनबरोबर संघर्ष करायचा नव्हता. पण पुढच्या काळात भारताने पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक धोरण स्वीकारले, असा दावा मुशाहिद हुसैन यांनी केला. याचे कारण पाकिस्तानात राजकीय अस्थैर्य माजले असून पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. याचा पुरेपूर फायदा भारताने घेतला आहे. म्हणूनच राजकीय पातळीवरील अस्थैर्य दूर करण्यासाठी आपल्या देशात व्यापक राजकीय संवादाची गरज आहे. पाकिस्तानच्या सर्वच राजकीय पक्षांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुशाहिद हुसैन यांनी केले.

सत्ताधारी पक्ष ‘पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ’चे (पीएमएल-एन) सदस्य असलेल्या मुशाहिद हुसैन यांनी सध्याचे विरोधी पक्षनेते इम्रान खान कुठल्याही प्रकारची चर्चा करायला तयार नाहीत, अशी तक्रारही या निमित्ताने नोंदविली आहे. भारताच्या पंतप्रधानांशी चर्चा करायला इम्रान खान तयार होते, पण पाकिस्तानच्या नेत्यांशी ते चर्चा करू इच्छित नाही. यामुळे पाकिस्तानात विसंवाद माजला असून त्याचे परिणाम दिसू लागल्याची टीका, मुशाहिद हुसैन यांनी केली आहे.

पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी भारताशी चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव त्यावेळचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमान्य करून भारताच्या विरोधात भूमिका स्वीकारली होती. मात्र पाकिस्तानची सध्याची स्थिती लक्षात घेता, भारताबरोबर सहकार्य करणे आवश्यक असल्याने आपण हा प्रस्ताव दिला होता, असे जनरल बाजवा यांनी म्हटले होते. तसेच हा प्रस्ताव इम्रान खान यांनी धुडकावल्यामुळे आज पाकिस्तानची दैना उडाल्याची टीका निवृत्त झालेल्या जनरल बजवा यांनी नुकतीच केली होती. पाकिस्तानातील मुत्सद्दी, विश्लेषक व भारतद्वेष्टे पत्रकार देखील सध्या भारताबरोबर सहकार्य करण्यावाचून पाकिस्तानसमोर दुसरा पर्याय नसल्याचे सांगत आहेत.

हिंदी

 

leave a reply