जी२०मध्ये भारतासमोर चीनचे आव्हान असेल

देशाच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा

नवी दिल्ली – पुढच्या वर्षी होणाऱ्या जी२० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे असेल. भारतासाठी ही फार मोठी संधी असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. मात्र या जी२० परिषदेत चीनबरोबर व्यवहार करणे हे भारतासाठी सर्वात मोठे आव्हान ठरेल, असा निष्कर्ष माजी उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पंकज सरन यांनी दिला. भारताने चीनपासून सावध राहण्याची भूमिका स्वीकारावी आणि चीनच्या शब्दांवर विश्वास न ठेवता या देशाच्या कृतीवर नजर ठेवावी, असा सल्ला सरन यांनी दिला आहे.

deputy-nsa-pankaj-saranपीटीआयला दिलेल्या मुलाखतीत माजी उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पंकज सरन यांनी आपण उभरती सत्ता असून चीनने हे मान्य करून आपल्याशी समान पातळीवर व्यवहार करावा, अशी भारताची अपेक्षा असल्याचे स्पष्ट केले. जी२०चा अध्यक्ष असलेल्या भारताशी सहकार्य करायचे की नाही याचा निर्णय चीनला घ्यावा लागणार आहे. भारतात होणाऱ्या या परिषदेसाठी चीनला आमंत्रित करावे लागेल. त्याचवेळी या परिषदेतील सर्वच कार्यक्रमांसाठीही चीन आमंत्रितांमध्ये असेल. अशा परिस्थितीत भारत ही उभरती आर्थिक सत्ता व शक्ती आहे, हे लक्षात घेऊन चीनने यासंदर्भातील निर्णय घ्यावे, अशी भारताची अपेक्षा आहे. त्यात काहीही वावगे नाही, ही बाब पंकज सरन यांनी लक्षात आणून दिली.

भारताचे सार्वभौमत्त्व, प्रादेशिक अखंडता आणि भारताबरोबर चीनने सीमेवर शांतता व सौहार्द राखण्यासंदर्भात केलेल्या करारांचा सन्मान चीनला करावाच लागेल. त्याबरोबरच भारताच्या मुलभूत हितसंबंधांचा आदर करणे चीनला भाग आहे, असे सरन पुढे म्हणाले. यासाठी चीनला लडाखच्या सीमेवर २०२० च्या आधीची स्थिती नव्याने प्रस्थापित करावी लागेल, असे सरन यांनी स्पष्ट केले. पण चीन जी२०च्या पार्श्वभूमीवर भारताबाबत अतिशय सावधपणाचे धोरण स्वीकारील, असा निष्कर्षही सरन यांनी नोंदविला आहे. पण जर का चीनला आपल्याला भारताबरोबर शांतीपूर्ण सहअस्तित्त्व हवे असेल, तर ते सिद्ध करण्याची उत्तम संधी या जी२० परिषदेच्या निमित्ताने चीनसमोर चालून आलेली आहे, असा दावा पंकज सरन यांनी केला.

दरम्यान, भारताने याआधीही चीनकडे आपल्या अपेक्षा स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. सीमेवर सैन्य तैनाती कायम ठेवून देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित केले जाऊ शकत नाही, असे भारताने चीनला बजावले होते. सीमेवर सलोखा व सौहार्द उभय देशांमधील सहकार्याच्या पायाभरणीसाठी अत्यावश्यक असल्याची बाब भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनच्या लक्षात आणून दिली होती. मात्र चीन यासाठी फारसा उत्सुक नसल्याचे दिसत आहे. सीमावाद तसाच ठेवून उत्तम व्यापारी सहकार्य प्रस्थापित केले जाऊ शकते, असे चीनचे म्हणणे आहे. मात्र भारताने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. यामुळे अजूनही भारताचे चीनबरोबरील संबंध ताणलेलेच आहेत.

इंडोनेशियाच्या बाली येथे नुकत्याच पार पडलेल्या जी२० परिषदेत भारताचे पंतप्रधान व चीनचे राष्ट्राध्यक्षांची औपचारिक भेट झाली. पण ही भेट द्विपक्षीय नाही, तर शिष्टाचारांपुरती मर्यादित होती. त्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव अजूनही निवळलेला नसल्याचे स्पष्ट झाले होते.

leave a reply