नवी दिल्ली – रशिया-युक्रेन युद्ध आणि इतर भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, यावर्षी भारतात जी20 परिषद पार पडणार आहे. तसेच या वर्षात जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व इजिप्तचे राष्ट्रप्रमुख भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. जी20 परिषदेच्या आधीच या देशांचे राष्ट्रप्रमुख भारताला भेट देतील. युक्रेनच्या युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती, हा या देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या भारताबरोबरील चर्चेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल, असे सांगितले जाते.
युक्रेनच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे अन्नधान्य व इंधनाची दरवाढ आणि टंचाईची भीषण समस्या जगासमोर खडी ठाकली आहे. तसेच जागतिक पातळीवरील उत्पादनासाठी आवश्यक असलेली पुरवठा साखळी देखील रशिया-युक्रेन युद्धामुळे बाधित झाली आहे. त्यातच चीनसारख्या देशाच्या महत्त्वाकांक्षा प्रचंड प्रमाणात वाढल्या असून चीनच्या बेलगाम कारवायांमुळे इंडो-पॅसिफिक सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात असमतोल निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताकडे समतोल प्रस्थापित करण्याची क्षमता असलेली शक्ती म्हणून मोठ्या आशेने पाहिले जाते. त्याचे प्रतिबिंब या वर्षात भारताच्या दौऱ्यावर येणाऱ्या प्रमुख देशांच्या दौऱ्यामध्ये पडल्याचे दिसते.
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सीसी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात दाखल होतील. त्यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून भारताने फार मोठी दूरदृष्टी दाखवलेली आहे, असा दावा पाकिस्तानातील एका विश्लेषकाने केला. इजिप्त भारताकडून ‘तेजस’ लढाऊ विमानांची खरेदी करण्यासाठी उत्सुक आहे. याचा फार मोठा धोरणात्मक लाभ भारताला मिळाल्यावाचून राहणार नाही, असा दावा या पाकिस्तानातील विश्लेषकांनी केला. याबरोबरच भारताच्या दौऱ्यावर येत असलेले जर्मनी, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रप्रमुख भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढते महत्त्व अधोरेखित करीत आहेत, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानसारखा देश काही अब्ज डॉलर्ससाठी प्रमुख देशांकडे हात पसरत आहे. पण ज्या देशांकडे पाकिस्तान मदतीची याचना करीत आहे, ते देश भारताकडे आपला प्रमुख सहकाही म्हणून पाहत आहेत. हे भारताला मिळालेले फार मोठे यश ठरते, याची कबुली या पाकिस्तानी विश्लेषकांनी दिली. भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानचे अपयश यामुळे प्रकर्षाने जगासमोर येत असल्याची खंत देखील या विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. भारताची आर्थिक प्रगती व प्रभावी परराष्ट्र धोरण यामुळे हे यश मिळत असल्याचे दावे सदर विश्लेषकांनी केले आहेत. रशिया व युक्रेनच्या युद्धात कुणा एका देशाची बाजू न घेता भारताने आपण शांततेच्या बाजूने असल्याचे जाहीर करून आपली तटस्थता दाखवून दिली. त्याचवेळी रशियाकडून इंधनाची खरेदी करून आपण पाश्चिमात्यांच्या दडपणाला बळी पडणार नाही, असा संदेश जगाला दिलेला आहे, याची दखल पाकिस्तानी माध्यमांनीच नाही, तर नेत्यांनी देखील घेतलेली आहे.
दरम्यान, युक्रेनच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी भारत अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, असा विश्वास युरोपिय देशांनाही वाटू लागला आहे. फ्रान्सचे नेते व राजनैतिक अधिकारी युक्रेनच्या समस्येवर आपली भारताशी महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असल्याचे सातत्याने सांगत आहेत. दोन्ही देशांचे हे सहकार्य युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी उपकारक ठरू शकते, असा दावा फ्रान्सच्या भारतातील राजदूतांनी काही आठवड्यांपूर्वी केला होता. या पार्श्वभूमीवर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भारतभेट लक्ष वेधून घेणारी ठरते. तर जर्मनीचे चॅन्सेलर ओलफा शोल्झ यांच्या भारतभेटीत दोन्ही देशांमधील सर्वच पातळ्यांवरील सहकार्य वाढविण्यावर सखोल चर्चा अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या भारतभेटीत उभय देशांमधील व्यापारी, राजनैतिक व लष्करी सहकार्याबरोबर इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबतच्या सहकार्याचाही मुद्दा ऐरणीवर असेल.
हिंदी