रावळपिंडी – राजधानी इस्लामाबादमध्ये लाँग मार्चद्वारे धडक मारण्याची घोषणा करणारे पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी हा लाँग मार्च रद्द केला आहे. मात्र पाकिस्तानमधील असेंब्लींमधून राजीनामा देऊन आपला पक्ष या राजकीय व्यवस्थेतून बाहेर पडत असल्याचा निर्णय इम्रान खान यांनी जाहीर केला. पाकिस्तानच्या पंजाब, खैबर पख्तुनख्वा, सिंध तसेच बलोचिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर व गिलगिट बाल्टिस्तान प्रांतात इम्रान खान यांच्या पक्षाचे सदस्य निवडून आलेले आहेत. ते सारे राजीनामा देणार असल्याचे जाहीर करून इम्रान खान यांनी पाकिस्तानात खळबळ माजविली. याबरोबरच त्यांनी आपल्या खूनाचा प्रयत्न करणारे तीन गुन्हेगार पुन्हा आपल्याला संपविण्याचा कट आखात असल्याचा गंभीर आरोप इम्रान खान यांनी केला आहे.
पाकिस्तानात फार मोठ्या राजकीय उलथापालथी सुरू झाल्या असून नव्या लष्करप्रमुखाच्या नेमणुकीनंतर विरोधी पक्षनेते इम्रान खान व त्यांचे सहकारी बिथरल्याचे दिसत आहे. लष्करप्रमुखपदावर लेफ्टनंट जनरल असीम मुनीर येणार असून ते इम्रान खान यांचे कट्टर विरोधक मानले जातात. इम्रान खान पंतप्रधानपदावर असताना त्यांच्या पत्नीच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण लेफ्टनंट जनरल असमी मुनीर यांनीच जगासमोर आणले होते. त्यांची लष्करप्रमुखपदावरील नियुक्ती म्हणजे पाकिस्तानी लष्कराचा इम्रान खान यांच्याशी ‘असहकार’ ठरतो असल्याचे दावे केले जातात. म्हणूनच इम्रान खान यांनी इस्लामाबादमध्ये लाँग मार्च घेऊन जाण्याचे टाळले आहे. यामुळे देशात अस्थैर्य व अराजक माजण्याची शक्यता असल्याचे सांगून इम्रान खान यांनी रावळपिंडीमधील रॅलीत ही योजना रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
मात्र सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग न बनता आपला ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्ष सर्वच प्रांतातील असेंब्लींमधून बाहेर पडेल, असे इम्रान खान यांनी जाहीर केले. पंजाब व खैबर पख्तुनख्वा आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर तसेच गिलगिट-बाल्टिस्तान या प्रांतांमध्ये ‘पीटीआय’चे सरकार आहे. तर सिंध व बलोचिस्तान प्रांतांच्या विधानसभांमध्येही पीटीआयचे सदस्य निवडून आलेले आहेत. हे सर्व सदस्य राजीनामा देऊन इथून बाहेर पडतील, अशी घोषणा करून इम्रान खान यांनी खळबळ माजविली. यामुळे पाकिस्तानातील सध्याच्या राजकीय व्यवस्थेला फार मोठा धक्का बसेल. पाकिस्तानच्या संसदेतील पीटीआयच्या सर्व सदस्यांनी आधीच राजीनामा दिलेला आहे. मात्र त्यांचे राजीनामे अद्याप मंजूर झालेले नाहीत. अशा परिस्थितीत हा निर्णय घेऊन इम्रान खान यांनी फार मोठी जोखीम पत्करल्याचे दिसते.
पाकिस्तानात लवकरात लवकर निवडणूक आयोजित करावी, अशी इम्रान खान यांची मागणी आहे. ही मागणी मान्य होत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असून याचे फार मोठे परिणाम पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेवर होऊ शकतात. त्याचवेळी पाकिस्तानात संसदेच्या निवडणूक झाल्याखेरीज आपण स्वस्थ बसणार नसल्याचे जाहीर करून इम्रान खान यांनी सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार व लष्करावरील दडपण कायम ठेवले आहे. याबरोबरच इम्रान खान यांनी आपल्याला संपविण्याचा कट नव्याने आखला जात असल्याचे गंभीर आरोप केले. याआधी आपल्या खूनाचा प्रयत्न करणारे तीन अपराधी पुन्हा तसे प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत, असा ठपका इम्रान खान यांनी ठेवला. याआधी इम्रान खान यांच्यावर लाँग मार्चच्या दरम्यान गोळीबार झाला होता व त्यांच्या पायाला गोळी लागली होती. या हल्ल्यामागे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, अंतर्गत सुरक्षामंत्री राणा सनाउल्लाह आणि आयएसआयचे अधिकारी मेजर जनरल फैसल नासीर असल्याचे आरोप इम्रान खान यांनी केले होते. रावळपिंडीमधील रॅलीमध्ये त्यांचा नव्याने उल्लेख न करता तीन गुन्हेगार पुन्हा आपल्याला संपविण्यासाठी कारस्थान आखत असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला.
दरम्यान, पाकिस्तानच्या सिनेटचे सदस्य व पीटीआयचे नेते अझम स्वाती यांना अटक झाली असून पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यामुळे ही कारवाई झाल्याचे सांगितले जाते. त्यावरही इम्रान खान यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पाकिस्तान हुकूमशाहीवादी देश बनल्याचे स्वाती यांच्या अटकेतून सिद्ध झाल्याचा दावा खान यांनी केला आहे. मात्र लष्करप्रमुखपदावर असीम मुनीर आल्यानंतर इम्रान खान व त्यांच्या सहकाऱ्यांना याहूनही अधिक कठोर कारवायांचा सामना करावा लागू शकतो, असे संकेत मिळत आहेत. त्यातच इम्रान खान यांच्याबद्दल सहानुभूती असलेले फैज हमीद यांच्यासारख्या लष्करी अधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे. अशा परिस्थितीत इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या लष्कराशी संघर्ष पुकारण्याचा निर्णय घेतलाच, तर त्याचे अधिक कठोर परिणाम समोर येतील, असे पाकिस्तानची माध्यमे देखील सांगू लागली आहेत.
हिंदी