नवी दिल्ली – भारत व चीनच्या सीमेवर यथास्थिती कायम असून दोन्ही देशांना इथली शांतता कायम राखण्याची इच्छा आहे, असे चीनचे नवे परराष्ट्रमंत्री क्विन गँग यांनी म्हटले आहे. एका अमेरिकन मासिकामध्ये लिहिलेल्या लेखात चीनच्या नव्या परराष्ट्रमंत्र्यांनी हा दावा करून एलएसीवरील तणावाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. पण भारताने चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी परिस्थितीची जाणीव करून दिली. दोन्ही देशांमधील सहकार्य विकसित होण्यासाठी सीमेवर सौहार्द व शांतता कायम राखणे आवश्यक ठरते, अशी भारताची आधीपासूनची भूमिका आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी बजावले.
‘हाऊ चायना सीज् द वर्ल्ड’ असे शीर्षक असलेला लेख क्विन गँग यांनी अमेरिकन मासिकासाठी लिहिला होता. चीनचे परराष्ट्रमंत्री बनण्याच्या आधी त्यांनी हा लेख लिहिला होता, असे सांगितले जाते. यात चीनच्या भारताबरोबरील सीमावादाचा उल्लेख करून गँग यांनी दोन्ही देशांना सीमेवर यथास्थिती व शांतता कायम राखण्याची इच्छा असल्याचा दावा केला होता. चीनचे आधीचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी देखील अशाच स्वरुपाचे दावे करून एलएसीवरील चीनची घुसखोरी व चिथावणीखोर कारवायांवर सारवासारव करण्याचे प्रयत्न केले होते. आता क्विन गँग देखील एलएसीवरील वादाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या लेखावरून उघड झाले आहे.
चीनकडून असे दावे करण्यात येत असले, तरी भारताने याबाबत ठाम भूमिका स्वीकारलेली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी भारत व चीनचे सहकार्य विकसित होण्यासाठी, सीमेवर शांतता व सौहार्द कायम ठेवणे आवश्यक असल्याचे बजावले. चीन याला महत्त्व न देता द्विपक्षीय सहकार्याचे प्रस्ताव भारताला देत आहे, ते स्वीकारता येणार नाही, असा संदेश परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पुन्हा एकदा चीनला दिला आहे. याबरोबरच भारताच्या संरक्षणदलांकडे देशाच्या सीमेचे रक्षण करण्याचे सामर्थ्य आहे, यावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सूचक विधान अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत केले.
दरम्यान, चीनमध्ये झालेल्या फेरबदलानुसार वँग ई यांच्या जागी परराष्ट्रमंत्री म्हणून क्विन गँग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्विन गँग यांची ओळख ‘चायनाज् वुल्फ वॉरिअर’ अशी केली जाते. माध्यमे तसेच सोशल मीडियाचा वापर करून चीनच्या वतीने इतर देशांना इशारे व धमक्या देण्यासाठी पुढाकार घेणारे राजनैतिक अधिकारी असलेल्या क्विन गँग यांना याच कारणासाठी ‘वुल्फ वॉरिअर’ म्हटले जाते. गेल्या काही वर्षांपासून चीनने ‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’चे प्रयोग सुरू केले होते. यानुसार चीनचे राजनैतिक अधिकारी दुसऱ्या देशांना आर्थिक निर्बंधांचे इशारे, भयंकर परिणामांच्या व आणि थेट युद्धाच्या धमक्या देतात. विशेषतः साऊथ चायना सीच्या वादात या वुल्फ वॉरिअर डिप्लोमसीचा चीनने अनेकवार वापर केला होता. यात क्विन गँग आघाडीवर होते.
अशा आक्रमक व जहाल भाषेसाठी प्रसिद्ध असलेल्या नेत्याला परराष्ट्रमंत्री करून चीनने पुढच्या काळातील आपल्या धोरणांचे संकेत दिले आहेत. मात्र भारताबाबत बोलताना क्विन गँग यांनी सावध सुरूवात केल्याचे दिसते. अमेरिकन मासिकामधील आपल्या लेखात क्विन गँग यांनी एलएसीवर यथास्थिती कायम ठेवण्याची इच्छा दोन्ही देशांकडे असल्याचे विधान करून चीनला भारताबरोबर उत्तम संबंध हवे असल्याचे संकेत दिले. पण क्विन गँग फार काळ संयमी राजनैतिक भाषा कायम राखू शकतील का, हा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. मात्र साऊथ चायना सी क्षेत्रातील छोटे व तुलनेने दुबळ्या देशांना धमक्या देणे आणि भारताबरोबर राजनैतिक व्यवहार करणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, याची जाणीव क्विन गँग यांना असेल, अशी अपेक्षा आहे.