इंदोर – आर्टिफिशल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि क्लाऊड कॉम्प्युटिंग हे ‘एबीसी’ म्हणजे जगाचे भवितव्य आहे. पुढच्या काळात हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरेल आणि भारतीय या आघाडीवर जगाचे नेतृत्त्व करू शकतात, असा संदेश केंद्रीय माहिती व प्रसारण तेच युवा आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला. मध्य प्रदेशच्या इंदोर येथे आयोजित करण्यात आलेल्या 17 ‘प्रवासी भारतीय दिवस’ समारोहाला संबोधित करताना ठाकूर यांनी हा संदेश दिला. तर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी परदेशात वास्तव्य करणाऱ्या भारतीय तरुणांसमोर आधीच्या काळापेक्षा अधिक नव्या संधी चालून आलेल्या असल्याचे म्हटले आहे.
इनोव्हेट, इन्व्हेस्ट, इनिशिएट अर्थात नवनिर्मिती व संशोधन, गुंतवणूक व पुढाकार घेऊन आपल्या संकल्पना भारतात राबवा, असे आवाहन अनुराग ठाकरून यांनी या समारोहात उपस्थित असलेल्या भारतीय युवकांना केले. 2022 सालात भारत आपल्यावर राज्य करणाऱ्या देशाला मागे टाकून पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला आहे. पुढच्या काळात भारत आपल्या युवाशक्तीच्या बळावर जगाचे नेतृत्त्व करू शकेल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला. आर्टिफिशल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि क्लाऊड कॉम्प्युटिंग हे ‘एबीसी’ म्हणजे भवितव्य असून या आघाडीवर भारतीय तरुण जगाचे नेतृत्त्व करू शकतात, असे सांगून ठाकूर यांनी भारतीय तरुणांकडे ही क्षमता असल्याचा दावा केला.
भारताची विशाल जनसंख्या व या जनसंख्येतील 60 टक्क्यांहून अधिक प्रमाणात तरुणांचा समावेश, ही फार मोठी बाब ठरते. या युवाशक्तीकडे देशाला झपाट्याने प्र्रगतीपथावर नेण्याची क्षमता आहे. या कर्तबगार तरुणांनी भारताला स्टार्टअपच्या आघाडीवरील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनविले आहे. आत्ताच्या घडीला देशात 80 हजाराहून अधिक प्रमाणात स्टार्टअप काम करीत आहेत. सारे जग कोरोनाच्या संकटाशी झुंजत असताना, भारतीय तरुण मात्र आपल्या स्टार्टअपचे युनिकॉर्नमध्ये रुपांतर करण्यासाठी अर्थात एक अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या कंपनीत रुपांतर करण्यासाठी प्रयत्नशील होते, असा गौरवास्पद उल्लेख अनुराग ठाकूर यांनी केला.
भारताला टेक्निकल पावरहाऊस बनविण्यासाठी काही तरुण प्रयत्न करीत असून याचा धोरणात्मक लाभ भारताला मिळालेला आहे, याचीही जाणीव यावेळी अनुराग ठाकूर यांनी करून दिली. तर या कार्यक्रमात बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी परदेशात वास्तव्य करणाऱ्या भारतीय तरुणांना आधीच्या तुलनेत फार मोठी संधी उपलब्ध झालेली आहे, असा दावा केला. तसेच परदेशात वास्तव्य करणारे भारतीय सर्वात प्रतिभाशाली असून हा परदेशातील भारतीय समुदाय आपल्या देशाशी घट्टपणे जोडलेला आहे, ही वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरते. हा दुतर्फा मार्ग असून प्रवासी भारतीय दिवस हीच बाब अधोरेखित करीत असल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले.
हिंदी