जम्मू व काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांविरोधात व्यापक शोधमोहीम

पूंछ – गुरुवारी पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या वाहनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात शहीद झालेल्या पाच जवानांना लष्कर व पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या या जवानांचे ऋण देश कधीही विसरणार नाही, असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याचवेळी हा हल्ला घडविणाऱ्या दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. यासाठी लष्कराने व्यापक मोहीम हाती घेतली असून हेलिकॉप्टर्स, ड्रोन्स व श्वानपथकाचा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा जम्मू व काश्मीरमध्ये निषेध केला जात असून पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत. तर पूंछमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर हल्ला चढविणार असल्याचे दावे या देशातील कट्टरपंथिय करीत आहेत.

जम्मू व काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांविरोधात व्यापक शोधमोहीमगुरुवारी पूंछ जिल्ह्यातील भिमर गली येथे राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या लष्करी वाहनावर ग्रेनड हल्ला झाला व यात पाच जवान शहीद झाले. यानंतर लष्कराने हल्लेखोर दहशतवाद्यांसाठी व्यापक शोधमोहीम हाती घेतली. अद्याप याला यश मिळालेले नसले तरी लवकरच हल्लेखोर दहशतवादी हाती लागतील, असे दावे केले जातात. जम्मू व काश्मीरमध्ये जी20चे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे या दहशतवादी हल्ल्याकडे देशाच्या सुरक्षा यंत्रणा अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत. त्याचवेळी जम्मू व काश्मीरच्या सुरक्षेसंदर्भात उच्चस्तरिय बैठकांचे आयोजन केले जात आहेत.

भारतात सुरू असलेल्या या घडामोडींमुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडल्याचे दिसते. पाकिस्तानातील भारतद्वेष्टे कट्टरपंथिय या हल्ल्याचा वापर करून भारत आपल्या देशावर हल्ला चढविण्याची तयारी करीत असल्याचे दावे करू लागले आहेत. इतकेच नाही तर या हल्ल्याची भारताने फार आधीपासूनच तयारी करून ठेवलेली आहे, असे या कट्टरपंथियांचे म्हणणे आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा भूभाग जिंकण्यासाठी भारत लष्करी मोहीम राबवू शकतो, असा इशारा देखील या कट्टरपंथियांनी दिला आहे. त्याचवेळी सुसज्ज भारताला तोंड देण्याची तयारी पाकिस्तानने केलेली नाही, असे सांगून पाकिस्तानच्या सुरक्षेवर हे कट्टरपंथिय चिंता व्यक्त करीत आहेत.

leave a reply