इस्लामाबाद – पाकिस्तानात सरकार व विरोधी पक्ष तसेच लष्करी अधिकाऱ्यांमध्येही दुफळी माजली असून पाकिस्तानची अर्थव्यवस्था कंगालीच्या स्थितीत आहे. अफगाणिस्तानबरोबरील सीमेवर तालिबाकडून पाकिस्तानच्या लष्करावर हल्ले सुरू झाले आहेत. याचे विघातक परिणाम पाकिस्तानात दिसत असताना, पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखांनी भारतद्वेषाच्या मुद्यावर आपल्या देशाला एक करण्याची तयारी केली आहे. ‘पीओके’ अर्थात पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा दौरा करून पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी भारताच्या आक्रमणाला पाकिस्तानचे लष्कर सडेतोड प्रत्युत्तर देईल, अशी धमकी दिली. तसेच भारताला आपले कुटील हेतू कधीही साध्य करता येणार नाहीत, असा इशारा देखील पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी नॉर्दन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पीओकेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले होते. पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी सरकारने आदेश दिल्यास पीओकेचा ताबा घेण्याची क्षमता व सिद्धता लष्कराकडे आहे, असे म्हटले होते. सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पीओकेचा भूभाग भारताचाच हिस्सा असून भारतीय संसदेने फार आधीच याबाबतचा निर्णय घेतलेला आहे, याचीही आठवण लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी करून दिली होती. त्यांच्या या विधानानंतर पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये गदारोळ माजला होता. पाकिस्तानातील अस्थिरतेचा फायदा घेऊन भारत पीओके ताब्यात घेण्यासाठी हल्ला चढविणार असल्याची भीती पाकिस्तानी माध्यमे व्यक्त करीत होती. त्याचवेळी भारताकडून अशा धमक्या दिल्या जात असताना, पाकिस्तानचे लष्कर त्याला प्रत्युत्तर का देत नाही, असे प्रश्नही ही माध्यमे विचारीत होती.
त्यानंतर पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखांनी भारताला धमकावणारी विधाने करून या या देशातील माध्यमांना खूश केले आहे. पण त्यांची ही विधाने भारतापेक्षा पाकिस्तानी जनतेलाच संदेश देण्यासाठी असल्याचे दिसते. सध्या पाकिस्तानचे सरकार व विरोधी पक्षनेते इम्रान खान यांच्या जोरदार संघर्ष सुरू आहे.
सध्या इम्रान खान यांनी राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारणारी निदर्शने मागे घेतली. पण सर्वच प्रांतातील विधानसभांमधून आपल्या पक्षाचे सदस्य राजीनामा देणार असल्याचे सांगून इम्रान खान यांनी खळबळ माजविली. यामुळे पाकिस्तानात राजकीय अस्थिरता निर्माण होईल, असे दावे केले जातात. हा राजकीय संघर्ष टाळण्यासाठी पाकिस्तानच्या सरकारने इम्रान खान यांना कुठलीही पूर्वअट न लादता चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.
पाकिस्तानचे सरकारच नाही तर या सरकारच्या मागे उभ्या असलेल्या लष्करावरही विरोधी पक्षनेते इम्रान खान व त्यांचे सहकारी सातत्याने टीका करीत आहेत. याचे परिणाम दिसू लागले असून पहिल्यांदाच पाकिस्तानचे लष्कर विरोधी पक्षाला जनतेकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे दबावाखाली आले आहे. अशा परिस्थितीत भारताच्या हल्ल्याची शक्यता वर्तवून जनरल मुनीर आपल्या देशाला एकजुटीचा संदेश देत असल्याचे दिसते. मात्र सध्याच्या परिस्थितीत लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या संदेशाचा विशेष परिणाम पाकिस्तानवर होणार नसल्याचे दिसते आहे. भारताने आर्थिक व तंत्रज्ञान तसेच इतर क्षेत्रात जबरदस्त प्रगती केली आहे आणि सतत लष्करी उठावाचा सामना करणारा पाकिस्तान भारताच्या तुलनेत खूपच मागे पडलेला आहे. या पिछेहाटीला पाकिस्तानचे लष्करच जबाबदार आहे, याची जाणीव पाकिस्तानच्या जनतेला झालेली आहे. त्यामुळे लष्कराच्या विरोधात असंतोष वाढत चालला असून आपले लष्कर अकार्यक्षम, भ्रष्ट असल्याचा ठपका पाकिस्तानचे पत्रकार व विश्लेषक उघडपणे करू लागले आहेत. त्याला इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते दुजोरा देत आहेत.
हिंदी