नवी दिल्ली – हिंदी महासागर क्षेत्रात चिनी नौदलाकडून सुरू असलेल्या हालचालींवर भारतीय नौदलाची करडी नजर रोखलेली आहे, असे भारताच्या नौदलप्रमुखांनी बजावले. ४ डिसेंबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘नेव्ही डे’च्या निमित्ताने नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चिनी नौदलाच्या हिंदी महासागरातील हालचालींबरोबरच, विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आणि नौदलातील महिलांचा समावेश व त्यांच्या तैनातीबाबत ॲडमिरल हरि कुमार यांनी महत्त्वाची माहिती दिली. तसेच नौदलासाठी लवकरच अमेरिकेकडून सुमारे ३० ‘एमक्यू-९बी प्रिडेटर ड्रोन’ खरेदी करणार असल्याचे नौदलप्रमुखांनी स्पष्ट केले. तर २०४७ सालापर्यंत देशाचे नौदल पूर्णपणे आत्मनिर्भर बनणार असल्याची ग्वाही यावेळी नौदलप्रमुखांनी दिली.
चीनच्या ‘पीएलए’ची सुमारे चार ते सहा जहाजे हिंदी महासागर क्षेत्रात वावरतात. याबरोबरच संशोधन करणारी चीनची जहाजेही या क्षेत्रात आहेत. तसेच मच्छिमारी करणारी चीनची जहाजे मोठ्या संख्येने हिंदी महासागर क्षेत्रात येत असतात. या सर्वांवर भारतीय नौदलाची करडी नजर रोखलेली आहे, असे नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार यांनी बजावले. हिंदी महासागर क्षेत्रात एकाच वेळी जवळपास ६० देशांच्या जहाजांचा वावर असतो, कारण हे सागरी क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे असून इथून मोठ्या प्रमाणात इंधनाची वाहतूक होते. अशा परिस्थितीत देशाचे हितसंबंध सुरक्षित ठेवणे, ही भारतीय नौदलाची जबाबदारी ठरते, असे सूचक विधाने नौदलप्रमुखांनी केली आहेत.
चाचेगिरीविरोधातील मोहीम तसेच अन्य कारणे पुढे करून चीनच्या पीएलएच्या नौदलाकडून हिंदी महासागर क्षेत्रातील आपला वावर वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्यक्षात यामागे भारतीय नौदलाच्या या सागरी क्षेत्रातील नैसर्गिक प्रभावाला आव्हान देण्याचा चीनचा डाव आहे. साऊथ चायना सी क्षेत्रात आपल्या युद्धनौका व मच्छिमारी करणारी जहाजे घुसवून चीन इथल्या छोट्या देशांच्या सागरी सीमांवर अतिक्रमण करीत आहे. असेच प्रयोग हिंदी महासागरात भारताच्या विरोधात करण्याची तयारी चीनने केली आहे. मच्छिमारीच्या नावाखाली शेकडोंच्या संख्येने एकाच वेळी वावरणारी चीनची जहाजे म्हणजे या देशाच्या नौदलाचाच भाग असल्याचे आरोप याआधी अनेकवार झाले होते. संशोधनाच्या नावाखाली देखील चीन आपली जहाजे पाठवून टेहळणी करीत असल्याचे दावे केले जातात. त्या पार्श्वभूमीवर, चिनी नौदलाच्या हालचालींपासून भारत सावध असल्याचा इशारा नौदलप्रमुख आर. हरि कुमार यांनी दिला आहे.
४ डिसेंबर रोजी साजरा केल्या जाणाऱ्या नेव्ही डेच्या निमित्ताने नौदलप्रमुखांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नौदलासाठी अमेरिकेकडून ३० ‘एमक्यू-९बी प्रिडेटर ड्रोन’ खरेदी केले जाणार असून हा व्यवहार सुमारे तीन अब्ज डॉलर्सचा असेल, अशी माहिती नौदलप्रमुखांनी दिली. सागरी क्षेत्रात टेहळणीबरोबरच अत्यंत प्रभावी मारकक्षमता असलेले हे ड्रोन्स चीनच्या सीमेवर, तसेच हिंदी महासागर क्षेत्रातही तैनात केले जातील, असे सांगून नौदलप्रमुखांनी चीनला भारताच्या तयारीची जाणीव करून दिलेली आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात नौदलात सहभागी झालेली देशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका‘आयएसएस विक्रांत’ देशाच्या आत्मनिर्भरतेची साक्ष देत असल्याचा दावा नौदलप्रमुखांनी केला.
‘आयएनएस विक्रांत’चा नौदलातील सहभाग म्हणजे ऐतिहासिक घटना ठरते. देशाच्या आत्मनिर्भरतेची प्रखरता यामुळे जगासमोर आलेली आहे. मोजक्या देशांना विमानवाहू युद्धनौकेच्या उभारणीचे तंत्र अवगत आहे. यात आता भारताचा समावेश झाला, ही अभिमानाची बाब ठरते’ असे सांगून नौदलप्रमुखांनी त्यावर समाधान व्यक्त केले. देशासाठी तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेवर काम सुरू असल्याचे लक्षवेधी विधान ॲडमिरल आर. हरि कुमार यांनी यावेळी केले. आयएनएस विक्रांत ही ४५ हजार टन वजनाची विमानवाहू युद्धनौका आहे. तशाच क्षमतेच्या विमानवाहू युद्धनौकेची ऑर्डर द्यायची की ६५ हजार टनाच्या विमानवाहू युद्धनौकेची मागणी करायची, यावर चर्चा सुरू आहे. पण नौदल ६५ हजार टनाच्या विमानवाहू युद्धनौकेची मागणी करीत असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र काही सामरिक विश्लेषक हजारो कोटी रुपये खर्चुन महाकाय युद्धनौकांच्या उभारणीपेक्षा भारताने ताफ्यातील पाणबुड्यांची संख्या वाढवावी, असा सल्ला देत आहेत.
सध्या सुरू असलेल्या युक्र्रेनच्या युद्धानंतर संरक्षणसाहित्य आणि शस्त्रास्त्रांसाठी दुसऱ्या देशांवर विसंबून राहता येणार नाही, हा धडा मिळालेला आहे. म्हणूनच सरकार आत्मनिर्भरतेसाठी करीत असलेल्या प्रयत्नांना नौदल संपूर्ण सहकार्य करीत असल्याचे नौदलप्रमुखांनी स्पष्ट केले. २०४७ साली भारतीय नौदल पूर्णपणे आत्मनिर्भर बनेल, अशी ग्वाही यावेळी नौदलप्रमुखांनी दिली. तसेच नौदलातील महिलांच्या सहभागाबाबत ॲडमिरल हरि कुमार यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. आघाडीच्या युद्धनौकांवर नौदलाच्या सुमारे २८ महिला अधिकारी तैनात असून ‘आयएनएस विक्रमादित्य’वर तैनात असलेल्या महिला अधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. नौदलात सहभागी झालेल्या अग्नीवीरांच्या पहिल्या पथकात तीन हजार जण सहभागी झाले व त्यात ३४१ महिला आहेत, असे नौदलप्रमुख पुढे म्हणाले. पुढच्या वर्षापासून नौदलाच्या सर्वच शाखांमध्ये महिलांचा समावेश करण्यात येईल, अशी घोषणा ॲडमिरल हरि कुमार यांनी केली.
हिंदी