नवी दिल्ली/लाहोर – इम्रान खान यांच्या अटकेवरून पाकिस्तानात निर्माण झालेल्या चिंताजनक परिस्थितीवर भारत नजर ठेवून आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. पंतप्रधानपदावर असताना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंचा अपहार केल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर असून यासाठी त्यांना अटक करण्याची तयारी पाकिस्तानच्या सरकारने केली होती. पण इम्रान खान यांच्या समर्थकांनी पोलीस दलावर हल्ले चढवून आपल्या नेत्याला अटक होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. इम्रान खान यांनी देखील सरकार व लष्कराच्या विरोधात आपल्या समर्थकांना चिथावणी दिली असून पाकिस्तानचे सरकार उलथण्याची तयारी केल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानातील या घडामोडींवर भारताच्या सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या असल्याचे सांगून यावर भारताची नजर रोखलेली आहे, असे अरिंदम बागची यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या भारतीय राज्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पाकिस्तानातील घडामोडींमुळे अधिक संवेदनशील बनल्याचे संकेत यावेळी बागची यांनी दिले. दरम्यान, इम्रान खान यांच्या समर्थकांनी त्यांना अटक करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी पोलिसांवर जोरदार हल्ला चढविला होता. यानंतर पोलीस दलाला सहाय्य करण्यासाठी निमलष्करी दल या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. मात्र कितीही रक्तपात झाला तरी आपल्या नेत्याला अटक होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका इम्रान खान यांच्या समर्थकांनी स्वीकारली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या न्यायालयाने सध्या इम्रान खान यांना अटक न करण्याचे आदेश दिलेले आहेत.
हा तात्पुरता दिलासा मिळालेला असला तरी इम्रान खान आपल्या विरोधात पाकिस्तानचे सारे भ्रष्ट नेते एकवटल्याचा दावा करून त्यांच्याविरोधात युद्धाची घोषणा करीत आहेत. ‘80च्या दशकात भारतातून पाकिस्तानात आल्यानंतर आपल्याला एका गरीब देशातून श्रीमंत देशात आल्यासारखे वाटायचे. पण 90च्या दशकात भारत खूपच पुढे गेला आणि पाकिस्तान मागे राहिला. बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला, हे बरेच झाले कारण पाकिस्तानला बांगलादेशाचे ओझे झाले असते, असे काहीजण सांगत होते. तो बांगलादेश आज पाकिस्तानला मागे टाकून जबरदस्त प्रगती करीत आहे, ही पाकिस्तानसाठी लाजिरवाणी बाब ठरते’, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या या मागासलेपणाला भ्रष्ट नेतेच जबाबदार असल्याचा ठपका इम्रान खान यांनी ठेवला. आता या नेत्यांपासून कायमची सुटका करून देण्यासाठी अखरेची धडक मारण्याची वेळ आलेली आलेली आहे, असा संदेश देऊन इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना चिथावणी दिली. ‘मी मोठा दहशतवादी असल्यासारखे दाखवून माझ्या विरोधात पोलीस व लष्कराच्या जवानांची तैनाती करण्यात आलेली आहे’, अशी तक्रार इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना केली. आपल्याला ठार मारण्याचे कारस्थान शिजले आहे. सध्या लंडनमध्ये असलेले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या इशाऱ्यावरून या साऱ्या कारवाया होत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी बुधवारी केला होता.
पाकिस्तानच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्या मरियम नवाझ यांनी इम्रान खान व त्यांचे समर्थक दहशतवादी असल्याचा ठपका ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून इम्रान खान व त्यांच्या समर्थकांनी पोलिसांवर हल्ले चढविले असून देशाच्या यंत्रणांना आव्हान दिले आहे, याचा दाखला देऊन मरियम नवाझ यांनी हा आरोप केला आहे.