नवी दिल्ली – भयंकर रक्तपाद सुरू असलेल्या सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ राबविण्यात आले आहे. भारतीय वायुसेनेची विमाने सौदीच्या जेद्दाह शहरात तर नौदलाची विनाशिका सुदानच्या बंदरात दाखल झाली आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली. सुदानची राजधानी खार्तुम व इतर भागातून आत्तापर्यंत ५०० भारतीयांना ‘पोर्ट सुदान’मध्ये आणण्यात आल्याचेही जयशंकर यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
गेल्या ११ दिवसांपासून सुदानमध्ये सुरू असलेल्या संघर्षात ४१३ जणांचा बळी गेला आहे. सुदानी लष्कर आणि निमलष्करी दलामध्ये झालेल्या या संघर्षाची व्याप्ती पुढच्या काळात अधिकच वाढेल आणि इथे अधिक रक्तपात होईल, असा दावा करण्यात येतो. त्यामुळे जगभरातील प्रमुख देशांनी सुदानमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याची तयारी केली आहे. यासाठी सौदी अरेबियाचे सहाय्य घेण्यात येत आहे. सौदी अरेबिया, युएई व इजिप्त हे देश या कार्यात आघाडीवर आहेत. सौदीने आत्तापर्यंत तीन भारतीयांना सुरक्षितरित्या सुदानमधून बाहेर काढले आहे. तसेच फ्रान्सने देखील आपल्या नागरिकांसह भारतीयांचीही इथून सुटका केल्याचे सांगितले जाते.
सुदानमध्ये तीन हजाराहून अधिक भारतीय अडकून पडले आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून या संदर्भात केंद्र सरकारने शुक्रवारी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सुदानमधील भारतीयांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी सज्जता ठेवण्याची सूचना केली होती. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात सौदी अरेबिया, युएई आणि इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संपर्क साधला होता. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांचीही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भेट घेतली होती.
सुदानमधील परिस्थिती चिघळत असताना, भारताने वायुसेनेची दोन ‘सी-१३०जे’ ही अवजड वाहतूक करणारी विमाने सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये तयार ठेवली आहेत. तर नौदलाची विनाशिका आयएनएस सुमेधा सुदानचे बंदर ‘पोर्ट सुदान’मध्ये दाखल झाली आहे. आकस्मिक परिस्थिती उद्भवली तर भारतीयांच्या सुटकेसाठी तातडीची उपाययोजना करण्यासाठी ही सज्जता ठेवण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत सुमारे ५०० भारतीय पोर्ट सुदान बंदरावर दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांची सुटका आता सुनिश्चित बनली आहे. त्याचवेळी सुदानमध्ये अडकून पडलेल्या इतर भारतीयांच्या सुटेकसाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत.