नवी दिल्ली – ‘ज्या प्रमाणात भारताची आर्थिक शक्ती आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रभाव वाढत आहे, त्याच प्रमाणात भारताच्या विरोधातील कारवायांमध्ये देखील वाढ होत चालली आहे. पुढच्या काळात देशावर अधिक प्रमाणात प्रहार केले जातील. देशातील बंधुभाव व सामाजिक सलोखा यांना लक्ष्य करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारताच्या यंत्रणांवरचा दबावही वाढविला जाईल. या आव्हानांचाही आपल्याला सामना करावा लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावले आहे. यासाठी सीबीआयने देखील सज्ज रहावे, असा संदेश पंतप्रधानांनी दिला.
‘सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन-सीबीआय’ला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्र्रमात पंतप्रधान बोलत होते. देशाचा विश्वास असलेली तपासयंत्रणा अशा शब्दात पंतप्रधानांनी सीबीआयचे कौतुक केले. जनमानसाचा अशारितीने विश्वास संपादन करणे ही सोपी बाब ठरत नाही, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. याबरोबरच देशाने विविध क्षेत्रात केलेल्या, विशेषतः इंटरनेट बँकिंग तसेच युपीआयच्या प्रगतीचा दाखला यावेळी पंतप्रधानांनी दिला. या पार्श्वभूमीवर, सायबर गुन्हेगारीच्या विरोधात कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
आत्ताच्या काळात तंत्रज्ञानाने केलेल्या जबरदस्त प्रगतीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. इतर क्षेत्रातील गुन्ह्यांसाठीही तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा विघातक वापर केला जात आहे. मात्र ज्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून या समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्याचे समाधान देखील तंत्रज्ञानातूनच मिळू शकते, असे सांगून सीबीआयने पुढच्या काळात यावर अधिकाधिक भर द्यावा, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. यासाठी टेक्नोसॅव्ही असलेल्या युवापिढीचे सहाय्य घेता यईल. सीबीआयमध्ये देखील अशी क्षमता असलेले कितीतरी तरुण असू शकतील. सायबर गुन्हेगारीसारख्या समस्या सोडविण्यासाठी आपण या टेक्नोसॅव्ही तरुणांचा अधिक चांगल्यारितीने वापर करू शकतो, असे पंतप्रधानांनी सुचविले.
याबरोबरच भ्रष्टाचाराच्या विरोधात कुठलेही दडपण न घेता कारवाई करण्याचा संदेश पंतप्रधानांनी सीबीआयला दिला. यासाठी आवश्यक असलेली राजकीय इच्छाशक्ती सरकारकडे आहे व सरकार पूर्णपणे सीबीआयच्या मागे असेल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. त्याचबरोबर बदलत्या काळानुसार पावले टाकण्याचा सल्ला देखील पंतप्रधानांनी सीबीआयला दिला आहे. पुढच्या वर्षात आपण कुठल्या मार्गाने जाणार आहोत व 2047 सालापर्यंत आपण काय करणार आहोत, याचा आराखडा सीबीआयने मांडावा आणि त्या दिशेने वाटचाल सुरू करावी, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.