नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात कर्नाटकच्या कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत बचावलेले वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. बुधवारी त्यांचे दुर्दैवी निधन झाले. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत संरक्षणदलप्रमुख बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत व संरक्षणदलांच्या ११ अधिकार्यांचा मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या वरुण सिंग यांच्यावर उपचार सुरू होते. कॅप्टन वरुण सिंग यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती, पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.
८ डिसेंबरला कर्नाटकच्या कुन्नूरमध्ये संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांना घेऊन जाणार्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये जनरल रावत, त्यांची पत्नी लष्कर व वायुसेनेचे अधिकारी होते. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते गेल्या आठवड्यापासून लाईफ सपोर्टवर होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. देशभरातून त्यांच्यासाठी प्रार्थना सुरू होती. तसेच त्यांना वाचविण्यासाठी देशातील निष्णात डॉक्टर व तज्ज्ञ प्रयत्न करीत होते. मात्र अखेर बुधवारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचीही प्राणज्योत मावळली.
संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये व्याख्यानासाठी जात असताना ही हेलिकॉप्टर दुर्घटना घडली होती. येथील सुलूर येथील हवाई तळावरच ग्रुप कॅप्टन वरुण सिंग तैनात होते. नुकताच त्यांना शौर्यचक्राने सन्मानित करण्यात आले होते.
गेल्यावर्षी ते उडवित असलेल्या तेजस विमानात बिघाड झालेला असताना आपले कॉकपिट न सोडता मोठ्या कौशल्याने त्यांनी हे विमान उतरविले होते. यासाठी त्यांना हे शौर्यपदक देण्यात आले होते.