भारताने इराणकडून इंधनाची आयात सुरू करावी

- इराणच्या राजदूतांचे आवाहन

नवी दिल्ली – भारताकडे पाश्चिमात्यांच्या दडपणाचा सामना करण्याची धमक आहे. त्यामुळे हे दडपण झुगारून भारत इराणकडून इंधनाची आयात करील, असा विश्वास भारतातील इराणच्या राजदूतांनी व्यक्त केला. तसेच भारताने आपल्या छाबर बंदराचा लवकरात लवकर विकास करून इथून व्यापारी वाहतूक सुरू करावी. याचे फार मोठे लाभ भारत व इराणलाही मिळतील, असे इराणचे राजदूत इराज ईलाही यांनी म्हटले आहे.

भारताने इराणकडून इंधनाची आयात सुरू करावी - इराणच्या राजदूतांचे आवाहनपाश्चिमात्यांनी दिलेल्या निर्बंधांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून भारताने रशियाकडून इंधनाची आयात वाढविली होती. इराणबाबतही भारताने तसेच करावे, अशी अपेक्षा या देशाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी इराणने भारताला सवलतीच्या दरात इंधनाचा पुरवठा करण्याचा प्रस्तावही दिला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून इराण सातत्याने भारताकडे ही मागणी करीत आहे.

2018 साली अमेरिकेने इराणच्या इंधननिर्यातीला लक्ष्य करणारे निर्बंध टाकले होते. त्यामुळे भारताला इराणकडून इंधनाची आयात करणे अवघड बनले. दोन्ही देशांमधील इंधनव्यवहार बाधित झाल्यानंतर याचा फार मोठा फटका इराणला बसला होता. मात्र अशा स्थितीतही भारताचे इराणबरोबरील द्विपक्षीय सहकार्य सुरू होते. विशेषतः इराणचे छाबर बंदर भारत विकसित करून या बंदराचा व्यापारी वाहतुकीसाठी वापर करण्याची तयारी भारताने केली होती. या बंदराद्वारे अफगाणिस्तान व अफगाणिस्तानातून मध्य आशियाई देशांपर्यंत व्यापारी वाहतूक करण्याची महत्त्वाकांक्षी योजना भारत व इराणने आखली होती.

राजदूत इराज ईलाही यांनी देखील छाबर बंदराचा भारताने लवकरात लवकर विकास करावा व याचा वापर सुरू करावा, असे आवाहन केले. भारतीय माध्यमांशी संवाद साधताना ईलाही यांनी याबाबतचा प्रस्ताव पुन्हा एकदा भारतासमोर मांडला. छाबर बंदराद्वारे भारत इराणच्या इंधनाची आयात करू शकतो आणि याचा फार मोठा लाभ भारतीय इंधनकंपन्या, ग्राहक आणि अर्थव्यवस्थेला होईल, असा दावा इराणच्या राजदूतांनी केला.

छाबर बंदर केवळ आर्थिक नाही, तर धोरणात्मकदृष्ट्या देखील भारतासाठी महत्त्वाचे ठरते, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न इराणच्या राजदूतांनी यावेळी केला. तसेच भारताचा इराणबाबतचा दृष्टीकोन सकारात्मक असल्याचे सांगून यावर इराज ईलाही यांनी समाधान व्यक्त केले. भारताने इराणकडून इंधनाची आयात सुरू करावी - इराणच्या राजदूतांचे आवाहनआधीच्या काळात दोन्ही बाजूंनी काही द्विपक्षीय संबंधांच्या आघाडीवर काही कमतरता राहिल्या होत्या, याचीही कबुली राजदूत ईलाही यांनी दिली.

दरम्यान, इराणने चीनच्या मध्यस्थीने सौदी अरेबियाबरोबरील आपले संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. चीनच्या मध्यस्थीने झालेल्या या ‘डील’बाबत भारताने अस्वस्थ होण्याचे काहीच कारण नाही, असा निर्वाळा इराणच्या राजदूतांनी दिला. सौदी अरेबियाबरोबरील इराणच्या सहकार्याचे भारताला लाभच मिळतील, असा विश्वास राजदूत ईलाही यांनी व्यक्त केला आहे.

इराण व सौदी अरेबियामध्ये सुरू झालेल्या राजनैतिक सहकार्याचे भारताने स्वागत केले होते. भारत नेहमीच मतभेद दूर करण्यासाठी राजनैतिक संवादाचा पुरस्कार करीत आला आहे, असे सांगून परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सौदी-इराणमध्ये सुरू झालेल्या राजनैतिक चर्चेचे स्वागत केले होते.

हिंदी

 

leave a reply