नवी दिल्ली – चीनबरोबर तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदी महासागर क्षेत्रात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलामध्ये युद्धसराव पार पडला. भारत-चीनमधील तणाव वाढल्यानंतर अंदमान निकोबार बेटांच्या क्षेत्रात मलाक्काच्या सामुद्रिधुनीजवळ झालेला पाचवा महत्त्वाचा युद्धसराव आहे. याआधी अमेरिका, जपान, फ्रान्स आणि रशियाबरोबर भारताने या क्षेत्रात युद्धसराव करून चीनला खरमरीत संदेश दिला होता.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या या नौदल युद्धसरावात भारताच्या ‘आयएनएस सह्याद्री’ आणि ‘आयएनएस कर्मुक’ या विनाशिका सहभागी झाल्या होत्या. तसेच ऑस्ट्रेलियन नौदलाची ‘एचएमएएस होबार्ट’ ही विनाशिका सहभागी झाली होती
कोरोनाव्हायरस संकटानंतर चीन आणि ऑस्ट्रेलियाचे ही संबंध ताणले गेले आहेत ऑस्ट्रेलिया चीनकडून केली जाणारी हेरगिरीचा मुद्दाही दोन्ही देशांमध्ये वादाचा ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने चीन विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून ‘साऊथ चायना सी’ मध्येही अमेरिकेबरोबर ऑस्ट्रेलियाने सहकार्य वाढविले आहे
भारत ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या नौदल युद्धसरावातून दोन्ही देश चीनच्या वर्चस्ववाद आणि विस्तारवादाविरोधात एकत्र असल्याचा संदेश चीनला देण्यात आला आहे. तसेच चीनचा मुकाबला करण्यासाठी भारत तयार असून आपल्याला पाठिंबा असणाऱ्या देशांची संख्या सतत वाढत आहे, हा संदेशही भारताने या सरावातून चीनपर्यंत पोहोचवला आहे. याशिवाय हा युद्धसराव म्हणजे भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांमधील चीन विरोधातील सहकार्य अधिक भक्कम झाल्याचे दर्शवत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.