नवी दिल्ली – अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर पाकिस्तानला त्यापासून काहीही फायदा झालेला नाही. उलट तालिबानच्या राजवटीखालील अफगाणिस्तानामुळे पाकिस्तानला भारतापेक्षाही अधिक मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. तसेच अफगाणिस्तानातील सत्ताबदलाचा लाभ चीनला देखील मिळालेला नाही, असे भारताचे माजी राजनैतिक अधिकारी श्याम सरन यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमादरम्यान माध्यामांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना श्याम सरन यांनी हे निष्कर्ष नोंदविले.
अफगाणिस्तानातील आधीचे सरकार आपल्याशी मैत्रिपूर्ण संबंध ठेवत नाही, असे पाकिस्तानला वाटत होते. म्हणूनच पाकिस्तानने तालिबानला सर्वतोपरी सहाय्य केले आणि अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आली. या सत्ताबदलानंतर पाकिस्तानला अपेक्षित होते ते फायदे मिळाले नाहीतच. उलट पाकिस्तान अफगाणिस्तानपासून अधिकच असुरक्षित बनला. आजच्या घडीला तालिबानच्या राजवटीखालील अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला भारतापेक्षाही मोठा धोका संभवतो, असे श्याम सरन यांनी म्हटले आहे.
त्याचवेळी चीनला देखील तालिबानच्या अफगाणिस्तानातील राजवटीकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची बाब सरन यांनी लक्षात आणून दिली. झिंजियांग प्रांतासाठी तालिबानचे सहाय्य चीनला हवे होते. पण तालिबानने चीनचा अपेक्षाभंग केला आहे. गेल्या दिड वर्षाच्या काळात तालिबानने पाकिस्तान व चीनला असे धक्के दिले आहेत आणि याच कारणामुळे या दोन्ही देशांनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला मान्यता दिलेली नाही, असा निष्कर्ष सरन यांनी नोंदविला.
अफगाणिस्तानात चीनचा प्रभाव वाढविण्यासाठी मध्यस्थाची भूमिका पाकिस्तानला पार पाडायची होती. पण तालिबानने तसे होऊ दिले नाही. अफगाणिस्तानातील परिस्थिती पाकिस्तानला वाटत होती, त्यापेक्षा खूपच गुंतागुंतीची ठरली, याकडे सरन यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी भारताचे अफगाणिस्तानबरोबरील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध पाकिस्तानच्याही कक्षेपलिकडे जाणारे असल्याचे उघड झाले आहे. भारत आणि अफगाणिस्तानचे हे संबंध पुढच्या काळात भारताच्या मध्य आशियाई देशांबाबतच्या धोरणात महत्त्वाची भूमिका पार पडतील, असा विश्वास सरन यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला शांतता व चर्चेचा प्रस्ताव दिला होता. पण त्यावर भारताने विश्वास न ठेवता सावध भूमिका स्वीकारावी, असा सल्ला श्याम सरन यांनी दिला आहे.