नवी दिल्ली – देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होत असतानाच, विकसित भारत घडविण्याचे स्वप्न तंत्रज्ञानामुळे साकार होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. त्याचवेळी जनसामान्यांना भेडसावणाऱ्या दहा प्रमुख समस्या ५जी,े आर्टिफिशल इंटेलिजन्स यासारख्या प्रगत तंत्रज्ञानामुळे सोडविता येतील. उद्योग, औषधनिर्मिती, शिक्षण आणि कृषी क्षेत्रावर या प्रगत तंत्रज्ञानाचा फार मोठा परिणाम होणार आहे, याकडे लक्ष वेधून या तंत्रज्ञानाचा मानवी वापर देशाला वेगाने प्रगतीपथावर नेईल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
‘अनलिशिंग पोटेन्शिअल: युझिंग टेक्नॉलॉजी टू मेक लाईफ इझिअर’ नावाचा वेबिनार आयोजित करण्यात आला होता. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, त्याची माहिती व लाभ जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘पोस्ट बजेट वेबिनार’चे आयोजन करण्यात येत आहे. मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या या वेबिनारला संबोधित करताना पंतप्रधानांनी पुढच्या २५ वर्षांच्या देशाच्या वाटचालीचा आराखडा मांडला. २०४७ साली देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे होत आहेत. यावेळी भारत विकसित देश म्हणून जगासमोर यावा, असे ध्येय समोर ठेवून काम करण्याचा संदेश पंतप्रधानांनी दिला होता. हे ध्येय तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे गाठता येऊ शकेल, असे पंतप्रधानांनी या वेबिनारमध्ये स्पष्ट केले. पुढच्या काळात ५जी, आर्टिफिशल इंटेलिजन्स यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा फार मोठा प्रभाव जनजीवनावर पडेल. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या दहा समस्या या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सुटू शकतील. कारण उद्योग, औषधनिर्मिती, शिक्षण आणि कृषी क्षेत्रावर या तंत्रज्ञानाचे फार मोठे परिणाम होतील. म्हणूनच या तंत्रज्ञानाचा सुयोग्यरितीने वापर केला, तर विकसित भारताचे ध्येय गाठता येऊ शकेल, असे सांगून पंतप्रधानांनी याचे काही दाखले देखील दिले.
डिजीलॉकर या सरकारच्या उपक्रमाचा वापर करून उद्योगक्षेत्र आपल्या फाईल्स व माहिती सरकारबरोबर ‘शेअर’ करू शकतात. अशा प्रकारच्या सेवांचा सामान्य जनतेला लाभ मिळू शकतो. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसमोरील अडथळे लक्षात घेऊन ते सोडविण्यासाठी सरकार प्रयत्न करू शकते. मात्र यासाठी ‘फिडबॅक’ अर्थात आवश्यक ती माहिती सरकारपर्यंत पोहोचायला हवी, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. याबरोबरच केंद्र सरकार अर्थसंकल्पांद्वारे जनसामान्यांचे जीवन अधिकाधिक सुखकर करण्याचा प्रयत्न करीत असून यासाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत, याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
आधीच्या काळातील सुमारे ४० हजार नियम सरकारने रद्दबातल केले आहेत. जनतेवर विश्वास न ठेवण्याची मानसिकता सरकारने झुगारून दिली असून ही मानसिकता गुलामगिरीच्या काळातून आलेली होती, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. तंत्रज्ञानाचा वापर करून केंद्र सरकारने ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’, प्रधानमंत्री जनधन योजना, आधार कार्ड, मोबाईलची क्रांती यासारख्या योजना हाती घेतला. यामुळे कोट्यवधी गरीबांच्या खात्यात थेट पैसे जमा करणे शक्य झाले, असे सांगून पंतप्रधानांचे याचे महत्त्व अधोरेखित केले. याबरोबरच आरोग्यसेतू व कोविन ॲप यांच्यामुळे कोरोनाच्या लसींचे वितरण करणे सोपे गेले, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले.