दहशतवादी हल्ल्यांचा धोका टळलेला नाही

- भारतीय अधिकाऱ्यांचा दावा

नवी दिल्ली – भारताला भविष्यात दहशतवादासह इतर अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागणार असून देशातील सुरक्षायंत्रणा त्याला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचा विश्वास लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी व्यक्त केला. त्याचवेळी देशात दहशतवादी हल्ले होण्याच्या शक्यतेकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. हरियाणातील मानेसर येथे ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ने(एनएसजी) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

दहशतवादी हल्ल्यांचा धोका टळलेला नाही - भारतीय अधिकाऱ्यांचा दावा‘नव्या तंत्रज्ञानामुळे शत्रूला त्याच्या कारवायांची व्याप्ती अधिक वाढविण्याची संधी मिळाली आहे. ड्रोन्स, इंटरनेट, सायबरस्पेस व सोशल मीडियाच्या माध्यमातून शत्रूच्या कारवाया वाढल्या आहेत. दहशतवाद व अंतर्गत सुरक्षेशी निगडीत समस्यांमुळे देशाच्या स्थैर्यावर परिणाम होत असल्याची सर्वांना जाणीव आहे. आपण या आव्हानांचा एकत्रितपणे मुकाबला करीत आहोत. त्यामुळे अनेक राज्यांमधील परिस्थिती सुधारत आहे’, याकडे लष्करप्रमुख जनरल पांडे यांनी लक्ष वेधले.

भविष्यातही देशाला या आव्हानांचा सामना करावा लागणार असून काही आव्हाने दीर्घकाळासाठी आहेत, हे लक्षात ठेवायला हवे. यातील काही अप्रत्यक्षरित्या तर काही छुप्या रितीने आपल्या आजूबाजूला कायम राहतील, असा दावा लष्करप्रमुखांनी यावेळी केला. देशात दहशतवादी हल्ल्यांच्या शक्यतेकडे लक्ष वेधतानाच गुप्तचर यंत्रणा व सुरक्षादलांकडून अनेक कट तसेच त्यामागील नेटवर्क्स उधळण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

मानेसरमधील कार्यक्रमात लष्करप्रमुख पांडे यांनी ‘एनएसजी’च्या कामाचीही प्रशंसा केली. बॉम्ब डिटेक्शन, स्नायपिंग व ड्रोन्ससंदर्भात एनएसजीने विकसित केलेली कौशल्ये उल्लेखनीय असल्याचे जनरल पांडे यांनी नमूद केले.

हिंदी

 

leave a reply