नवी दिल्ली – श्रीलंकेच्या कोलंबो पोर्ट सिटीचा प्रकल्प चीनला बहाल करण्यात आला आहे. गुरुवारी श्रीलंकेने याची घोषणा केली. श्रीलंकेतील चीनच्या या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका संभवतो. याची गंभीर दखल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतली. भारताबरोबरील उत्तम द्विपक्षीय संबंधांचा श्रीलंका विचार करील आणि दोन्ही देशांची सुरक्षा व पर्यावरण एकमेकांशी जोडलेले आहे, याची जाणीव श्रीलंका ठेवील, अशी अपेक्षा व्यक्त करून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी श्रीलंकेला समज दिली. भारताचे उपनौदलप्रमुख जी. अशोक कुमार यांनीही श्रीलंकेतील चीनचा हा प्रकल्प भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते, असे बजावले आहे.
श्रीलंका आणि चीनमध्ये सुमारे १.४ अब्ज डॉलर्सचा कोलंबो पोर्ट सिटी प्रकल्प घोषित करण्यात आला. चीनच्या सागरी ‘सिल्क रोड’ या महत्त्वाकांक्षी योजनेत सदर प्रकल्पाला फार मोठे स्थान असल्याचे सांगितले जाते. हिंदी महासागर क्षेत्रातील चीनचे प्रकल्प म्हणजे दुसरे तिसरे काही नसून भारताच्या विरोधातील घेराबंदी ठरते, असे सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे. श्रीलंकेच्या विरोधी पक्षांनी देखील चीनच्या या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. हा प्रकल्प म्हणजे श्रीलंकेतील चीनची वसाहत बनेल, अशी भीती विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे. तरीही हा प्रकल्प घोषित करून भारताच्या विरोधात मोर्चेबांधणी करणार्या चीनला सहाय्य करणार्या श्रीलंकेच्या सरकारला भारताने समज दिली.
कोलंबो पोर्ट सिटी प्रकल्पाबाबतच्या घडामोडींकडे भारत आपल्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत बारकाईने पाहत आहे. भारताबरोबरील आपल्या उत्तम द्विपक्षीय संबंधांचा श्रीलंका विचार करील आणि दोन्ही देशांची सुरक्षा व पर्यावरणविषयक हितसंबंध एकमेकांशी घट्टपणे जोडलेले आहेत व यामध्ये सागरी सुरक्षेचाही समावेश आहे, ही बाब देखील श्रीलंका विचारात घेईल, अशी अपेक्षा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त केली. भारतीय नौदलाने देखील या घडामोडींवर आपली नजर रोखलेली असल्याचा इशारा दिला आहे.
भारतीय नौदलाचे व्हाईस ऍडमिरल जी. अशोक कुमार यांनी श्रीलंकेत चीनच्या नौदलाला मिळालेला नवा प्रकल्प म्हणजे भारताच्या सुरक्षेसमोर खडा ठाकलेला धोका ठरतो, असे बजावले. याकडे अत्यंत गंभीरपणे पाहणे आवश्यक असल्याचे व्हाईस ऍडमिरल जी. अशोक कुमार यांनी स्पष्ट केले. पण भारतीय नौदल देशाच्या सागरी सीमा सुरक्षित राखण्यासाठी अतिशय सजग आहे आणि भारतीय नौदलाला कुणीही चकीत करण्याची शक्यता नाही. दशकभरापूर्वीपेक्षाही आत्ताच्या काळात भारतीय नौदल कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी अधिक सुसज्ज आहे, अशा शब्दात उपनौदलप्रमुखांनी चीनला इशारा दिला.
सागरी मार्गाने मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सावध झालेल्या भारतीय नौदलाने आपल्या क्षमतेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केलेली आहे. सागरी सुरक्षेसाठी नेटवर्क उभारून गस्त अधिक वाढविण्यात आली आहे, याकडे उपनौदलप्रमुखांनी लक्ष वेधले. दरम्यान, भारताच्या सागरी क्षेत्राजवळून जाणार्या जहाजांवर नजर ठेवण्यासाठी ‘एमक्यू-९ सी गार्डियन’ या दोन प्रिडेटर डोन्सचे सहाय्य घेतले जात आहे. या विस्तीर्ण सागरी क्षेत्रात गस्तीसाठी याचा फार मोठा लाभ मिळत आहे. यामुळे सागरी क्षेत्रातील चीन व जपानसारख्या देशांच्या जहाजांची माहिती मिळत आहेच. शिवाय नियमांचे पालन न करणार्या जहाजांचीही नोंद होत आहे, असे उपनौदलप्रमुख जी. अशोक कुमार म्हणाले.