हत्यासत्रानंतर काश्मीरबाहेरील मजुरांना सुरक्षा दलांच्या छावण्यांमध्ये हलविणार
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये दोन आठवड्यात ११ निष्पाप नागरिकांच्या हत्यांनी देशभरात संतापाचे वातावरण आहे. गेल्या चोवीस तासातच पाच काश्मीरबाहेरच्या मजुरांना दहशतवाद्यांनी लक्ष केले आहे. यामध्ये चौघांचा बळी गेला असून एक जण गंभीर जखमी आहे. रविवारी तीन मजुरांवर अशाप्रकारे हल्ला झाला. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी जम्मू-काश्मीरमध्ये कामानिमित्त राहत असलेल्या काश्मीरबाहेरील मजुरांना पोलीस व सुरक्षादलांच्या शिबिरांमध्ये हलविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. तर अशा हल्ल्यांमध्ये सामील कोणालाही सोडले जाणार नाही. दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या पाठिराख्यांना सोडले जाणार नाही. रक्ताच्या प्रत्येक थेबांचा सूड घेऊ असे, जम्मू जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये तेथील अल्पसंख्यांकांवरील हल्ल्याचे सत्र वाढले आहे. दहशतवाद्यांनी आता मोठी शस्त्र टाकून अशा हल्ल्यांसाठी पिस्तूलासारख्या छोट्या शस्त्रांचा वापर सुरू केला आहे. पाकिस्तानातातून ड्रोनद्वारे अशी छोटी शस्त्र पाठविली जात असल्याचे लक्षात आले आहे. दोन वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर येथे केंद्रीय कायदे लागू झाले. त्यामुळे मूळच्या इतर राज्यातील रहिवाशी असलेल्या मात्र गेली कित्येक वर्ष जम्मू-काश्मिरमध्ये रहात असलेल्या नागरिकांनाही रहिवाशी दाखला मिळू लागला. जमीन व नोकर्यांमध्ये अधिकार मिळू लागले. झपाट्याने सुरू झालेला विकास व रोजगार वाढत असताना जम्मू-काश्मीरमध्ये स्थैर्य येत असल्याचे स्पष्ट दिसत होते. यामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तान व पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी १९९० च्या दशकाप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये अराजक व दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी टार्गेट किलिंग सुरू केले आहे. काश्मिरी पंडित व इतर नागरिकांसह दुसर्या राज्यातून येथे कामासाठी व रोजगारासाठी आलेल्यांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे.
चोवीस तास जम्मू-काश्मिरमध्ये पाच मजुरांना लक्ष करण्यात आले आहे. शनिवारी दोन जणांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती. तर रविवारी सायकांळी तीन जणावर असे हल्ले झाले. कुलगाममध्ये हे काश्मीरबाहेरून आलेले मजूर राहत असलेल्या भाड्याच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये दोन मजुरांचा बळी गेला, तर एक जण जखमी झाला. गेल्या चोवीस तासात दहशतवाद्यांनी लक्ष केलेल्या मजुर व फेरीवाल्यापैकी चार जण बिहारचे असून एक उत्तर प्रदेशचा आहे. गेल्या दोन आठवड्यात दहशतवाद्यांनी अशाप्रकारे ११ जणांच्या हत्या केल्या आहेत. गेल्या आठवडाभरात आठ जणांच्या हत्या झाल्या आहेत.
जम्मू-काश्मीरमधील या टार्गेट किलिंगविरोधात देशभरात संताप असून ठिकाठिकाणी निदर्शनेही होत आहेत. रविवारीही जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या निर्दशने झाली असून पाकिस्तानविरोधात जोरदार नारेबाजी झाली. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये विविध ठिकाणी दहशतवाद्यांबरोबर सुरक्षादलांच्या चकमकी सुरू आहेत. दहशतवाद्यांविरोधात व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुंछ आणि राजौरीतील जंगलांमध्ये गेल्या सात दिवसांपासून शोध मोहिम सुरू आहे. पुंछमधील चकमकीत आतापर्यंत ९ जवानही शहीद झाले आहेत. हे गेल्या दशकभरातील जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठे ऑपरेशन मानले जात आहे.