नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रूपये उकळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य सूत्रधारासह पाचजणांना अटक केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नावाने बनावट वेबसाईटच्या माध्यमातून या रॅकेटने महिन्याभरात जवळपास १.०९ कोटी नोंदणी शुल्क उकळल्याचे उघड झाले. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जॉब रॅकेटचा भंडाफोड झाल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी केलेल्या तक्रारीनंतर हा घोटाळा उघडकीस आला. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नावाने ‘इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड पब्लिक वेल्फेअर’ अशी बनावट वेबसाईट तयार करण्यात आली होती. त्यावर १३ हजारांहून अधिक नोकऱ्या असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही जाहिरात पाहून बऱ्याच तरूणांनी ऑनलाईन परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले होते.
या वेबसाईटच्या माध्यमातून हजारो तरूणांना फसविण्यात आले. त्यांच्या तक्रारी नंतर पोलिसांना हरियाणाच्या हिस्सारमधून ही वेबसाईट चालविली जात असल्याची खबर मिळाली. त्यानंतर या टोळीतल्या सर्व साथीदारांना अटक करण्यात आली. अमनदीप खटकरी, सुरेंद्र सिंग, संदीप, रामधारी व जोगिंदर सिंग ही या आरोपींची नावे आहेत. या टोळीचा प्रमुख सूत्रधार रामधारी याचे दिल्लीच्या मुंडका परिसरात विविध सरकारी विभागासाठी ऑनलाईन परीक्षेचे सेंटर आहे. या सेंटरमध्ये येणाऱ्या परीक्षार्थींची माहिती चोरून रामधारी याने बनावट वेबसाईटद्वारे सरकारी विभागात नोकरी असल्याची जाहिरात तरूणांना पाठवायला सुरुवात केली होती.
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या संदीपने बनावट सरकारी वेबसाईट बनविली होती. या परीक्षेसाठी एकूण १५ लाख तरूणांनी या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले होते. त्यासाठी बॅंकेत खातेही उघडण्यात आले होते. सुरेंद्रसिंग याला खातेधारक बनविण्यात आले होते. अमनदीप नोकरीसाठी तरूणांनी बॅंक खात्यात जमा केलेले पैसे हिस्सारमधील एटीएममधून काढण्याचे काम करीत होता. अटक झाल्यानंतर पोलिसांनी तीन लॅपटॉप, सात मोबाईल फोन व बॅंक खात्यातील ४९ लाख रूपये जप्त केले आहेत.
या तरूणांना अकाउंटंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, अपर डिव्हिजनल क्लार्क, लोअर डिव्हिजनल क्लार्क, जनरल नर्सिंग, मल्टी टास्किंग स्टाफ, लॅब अटेंन्डट, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर व ड्रायव्हर या पदाचे आमिष दाखवून १०० ते ५०० रूपये उकळत होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी नोकरीसाठी अर्ज करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.