भारताने खडसावल्यानंतरही अरुणाचल प्रदेशबाबतचा चीनचा हेका कायम

बीजिंग/वॉशिंग्टन – अरुणाचल प्रदेशमधील ठिकाणांची नवी नावे ठेवून वास्तव बदलता येणार नाही. अरुणाचल प्रदेश भारताचा भूभाग होता व यापुढेही राहिल, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला खडसावले होते. ही बाब चीनला चांगलीच झोंबल्याचे दिसत आहे. झांगनान अर्थात अरुणाचल प्रदेशमधील ठिकाणांची नावे बदलण्याचा सार्वभौम अधिकार चीनला आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तर अरुणाचल प्रदेशवर चीन सांगत असलेल्या दाव्याविरोधात अमेरिकेने भारताची बाजू घेतली असून अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भूभाग असल्याचे ‘व्हाईट हाऊस’ने म्हटले आहे.

भारताने खडसावल्यानंतरही अरुणाचल प्रदेशबाबतचा चीनचा हेका कायमभारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी मंगळवारी अरुणाचल प्रदेशावरून चीनला चपराक लगावली होती. अरुणाचल प्रदेशमधील ११ ठिकाणांची नवी नावे चीनने जाहीर केली आहेत. याआधीही चीनने असे प्रकार करून पाहिले होते. पण याने वास्तव बदलत नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भूभाग होता आणि यापुढेही राहणार असल्याचे बागची यांनी बजावले. यानंतर बुधवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदविली. अरुणाचल प्रदेशवर चीनचाच सार्वभौम अधिकार असल्याचे सांगून ही नावे बदलण्याचा हक्क आपल्या देशाला असल्याचे माओ निंग म्हणाल्या.

याआधीही अरुणाचल प्रदेश म्हणजे दक्षिण तिबेट असून त्यावर आपला अधिकार असल्याचे दावे चीनने ठोकले होते. मात्र आता चीनला सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली असून तिबेटवरील चीनच्या अधिकारावरच भारताने प्रश्न उपस्थित करण्याची आवश्यकता असल्याचे भारतीय विश्लेषक सांगू लागले आहेत. तर काही मुत्सद्दी व राजकीय निरिक्षक चीन अशारितीने नावे बदलण्याच्या कारवाया काढून आपण भारताविरोधात काहीतरी करीत असल्याचा आभास निर्माण करू पाहत आहे, असा निष्कर्ष नोंदवित आहेत. त्यामुळे एका मर्यादेच्या बाहेर न जाता भारताने चीनच्या असल्या कारवायांकडे लक्ष न देता, चीनच्या विरोधातील डावपेचांवर काम करणे आवश्यक असल्याचे या मुत्सद्दी व राजकीय निरिक्षकांचे म्हणणे आहे. त्याचवेळी भारत या दिशेने योग्य ती पावले उचलत असल्याचा निर्वाळा देखील या मुत्सद्दी व निरिक्षकांनी दिला आहे. यामुळे भारतावर दडपण टाकण्याचे चीनचे प्रयत्न अपयशी ठरले असून यामुळे आलेल्या निराशेतून चीनला आपण भारताविरोधात काहीतरी करून दाखवित असल्याचे चित्र उभे करायचे आहे, याची जाणीवही या मुत्सद्दी तसेच निरिक्षकांनी करून दिली आहे.

दरम्यान, अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भूभाग असल्याचे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने म्हटले आहे. अमेरिकेचा भारताला पूर्ण पाठिंबा असून चीनच्या अरुणाचल प्रदेशवरील दाव्याला अमेरिकेचा कडवा विरोध असल्याचे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरन जेन-पेरी यांनी म्हटले आहे. फार आधीपासून अमेरिकेची हीच भूमिका असल्याचा दावा जेन-पेरी यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका भारताच्या अंतर्गत मुद्यांवर शेरेबाजी करीत असल्याचे उघड झाले होते. यावर भारतात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी अमेरिकेतील भारतीय दूतावासावर खलिस्तानी विघटनवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यानंतर, त्यांच्यावर कारवाई करण्यात अमेरिकन यंत्रणांनी दिरंगाई दाखविल्याचे उघड झाले होते. यानंतर काही देशांचे आपल्या व इतरांच्या सुरक्षेबाबतचे विचार दुटप्पी असल्याची टीका भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली होती. यामुळे अमेरिका चीनबरोबरील सीमावादात आपण भारताच्या बाजूने असल्याचे अधिक जोरदारपणे पुन्हा पुन्हा सांगत आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय व वरिष्ठ अधिकारी चीनबरोबरील सीमावादात आपण भारताच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे दावे करून भारताची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण भारत त्याकडे अधिक लक्ष द्यायला तयार नसल्याचे संकेत मिळत आहेत. अद्याप अमेरिकेने दिलेल्या पाठिंब्याची दखल घेऊन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यावर प्रतिक्रिया नोंदविलेली नाही.

हिंदी English

 

leave a reply