मनाली – ‘अटल टनेल’ व्यूहरचनात्मकदृष्ट्या अतिशय महत्वाचा ठरेल. ‘लाईन ऑफ अक्चुअल कंट्रोल’पर्यंत (एलएसी) ‘टी ९०’ रणगाडे आणि लष्करी वाहने अतिशय वेगाने पोहोचतील, अशी माहिती या प्रक्लपाचे संचालक कर्नल परीक्षित मेहरा यांनी दिली आहे. पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाची जय्यद तयारी सुरु झाली आहे. गुरुवारी संरक्षणसचिव अजय कुमार यांनी या टनेलला भेट दिली होती.
९.२ किलोमीटरचा या भुयारी मार्गामुळे मनाली आणि लेहमधले अंतर कमी होणार आहे. तसेच या भुयारी मार्गातून वर्षाच्या बाराही महिने प्रतिकूल परिस्थितीत लष्कराचे रणगाडे आणि वाहने धावू शकतील. कडाक्याच्या थंडीत आणि बर्फवृष्टीत रोहतांग पास सहा महिने बंद असतो. त्याला पर्यायी मार्ग म्हणून ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ने ‘अटल टनेल’ उभारला. भूकंप, भूस्खलन अशा आपत्तीमध्ये तग धरुन राहील, अशी या टनेलची रचना करण्यात आली आहे. सुरुवातीची दोन वर्षे फक्त ‘बीआरओ’कडून येथील वाहतुकीचे नियमन केले जाईल त्यानंतर ही जबाबदारी स्थानिक नागरी प्रशासनाकडे सोपविला जाईल, असे कर्नल मेहरा यांनी म्हटले.
दरम्यान, गुरुवारी संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी अटल टनेलला भेट दिली. त्यांच्यासोबत लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग आणि ‘बीआरओ’चे सहसचिव उपस्थित होते. अजय कुमार यांनी या टनेलची पाहणी केली. तसेच कुमार यांनी स्थानिक यंत्रणांशी चर्चा करुन उद्घाटनाच्या तयारीचा आढावा घेतला. अटल टनेल पासून काही अंतरावर शिंकूला येथे आणखी १३.५ किलोमीटर लांबीचा आणखी एक भुयारी मार्ग उभारण्यात येणार असून या दृष्टीने काम सुरु झाले आहे. या प्रकल्पाची व्यवहारात तपासण्याचे काम सुरु झाले आहे. या प्रकल्पाचे संचालक जनरल हरपाल सिंग यांनी नुकताच प्रकल्प ठिकाणाला भेट दिल्याचे वृत्त आहे.