मुंबई, (वृत्तसंस्था) – कोरोनाशी लढताना अर्थचक्र ही सुरू ठेवणे आवश्यक आहे असे सांगून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात ग्रीन ऑरेंज झोनमध्ये उद्योग व कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावले.
रविवारी राज्यात कोरोनाव्हायरसमुळे 12 जणांचा बळी गेला, तर एकाच दिवसात 552 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील या साथीमुळे दगावलेल्यांची संख्या वाढून 223 झाली असून रुग्णांची संख्या वाढून 4227 वर पोहोचली आहे . एकाच दिवसात राज्यात 500 हुन अधिक नव्या रुग्णांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रविवारी राज्यात दगावलेल्या 12 रुग्णांपैकी सहा मुंबईतील असून, चार जण मालेगावातील, सोलापूर आणि अहमदनगरमधील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील रुग्णांची संख्या 2,724 वर पोहोचली आहे. तर मुंबई आणि ठाणे विभाग मिळून एकूण रुग्ण संख्या 3,214 वर गेली आहे. मुंबईच आतातपर्यंत 132 जणांचा या साथीमुळे मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हाही या साथीचा हॉटस्पॉट ठरला आहे. पुण्यात आतापर्यंत 55 जण दगावले आहेत, तर 637 रुग्णांची आतपर्यंत नोंद झाली आहे.
तसेच वृत्तपत्र छापणे आणि पेपर स्टॉल यावर बंदी नसली तरी रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई व पुणे येथे वृत्तपत्राचे घरोघरी होणारे वितरण सुरू करता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.