नवी दिल्ली – देशभरात कोरोनाचे लसीकरण सुरू होण्यास चार दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या लसीचे वितरण सुरू झाले आहे. दिल्ली, बंगळूरू, अहमदाबादसह देशातील १३ शहरांमध्ये लसीचे पहिली कन्सायमेंट पोहोचली आहे. इतर राज्यांमध्येही लवकरच लसींची पहिली बॅच दाखल होईल. राज्यांमध्ये यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.
दहा दिवसांपूर्वी ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) देशात तयार झालेल्या कोरोना लसींना आपत्कालीन लसींना मंजुरी दिली होती. कोव्हॅक्सीन आणि कोवीशिल्ड या दोन लसी देशात लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहेत. मात्र लसीकरण सुरू झाले आणि लस देण्यात आली तरी निष्काळजीपणा दाखवून चालणार नाही. लसीकरणानंतरही आवश्यक ती दक्षता बाळगावी लागेल, असे आरोग्य मंत्रालयाने बजावले आहे.
देशभरात व्यापक लसीकरण मोहिमेला १६ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. मात्र मंगळवारपासून विविध राज्यांमध्ये लसींची बॅच पोहोचण्यास सुरूवात झाली आहे. यासाठी एअर इंडिया, स्पाईस जेट, इंडिगो आणि गो एअर या विमान कंपन्यांची विमाने वापरण्यात येत आहेत. पुण्याहून लसीची पहिली कन्सायमेंट दिल्लीला पोहोचली आहे. सीरम इन्स्टट्यूटमधून या लसी थेट वितरीत करण्यात आल्या आहेत. देशात १३ शहरांमध्ये लसीचे ५६.५ लाख डोस वितरीत करण्यात आले आहे. यामध्ये दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भूवनेश्वर, पटना, बंगळुरू, लखनौ आणि चंदीगड या राज्यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रासाठी सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे ९ लाख ६३ हजार डोस देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी लसीकरण सुरू होणार असून यासाठी ५११ ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येणार आहे. राज्यातील ७ लाख ८४ हजार आरोग्य कर्मचार्यांना ही लस देण्यात येईल. तसेच या लसी ठेवण्यासाठी ३ हजार १३५ कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, लसींच्या वितरणाच्या पार्श्वभूमीवर विमानतळांवर, तसेच लसीकरण केंद्र व या लसी ठेवण्यासाठी वापरण्यात येणार्या कोल्ड स्टोरेजची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
त्यामुळे सावध रहा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गुन्हेगारी टोळ्या लसीच्या मागणीचा फायदा उचलू शकतात. त्यामुळे सावध रहा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जनतेची फसवणूक टाळण्यासाठी पोलीस यंत्रणांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.