नवी दिल्ली – आसाममध्ये तिनसुखिया जिल्ह्यात ऑईल इंडिया लिमिटेडला (ओआयएल) नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला आहे. ‘दिंजन -१’ विहिरीत उत्खनन सुरु असताना हा साठा सापडला. या इंधन विहरीतून दर दिवसाला १ लाख १५ हजार क्युबिक मीटर नैसर्गिक वायू मिळू शकतो, असे प्राथमिक चाचणीत लक्षात आले असल्याचे ‘ओआयएल’ने जाहीर केले.
ब्रह्मपुत्रा आणि तिच्या पूरक नद्यांच्या शेजारील मैदानी प्रदेश असलेल्या अप्पर आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूचे साठे दडलेले आहेत. भारतात नैसर्गिक वायूचे सर्वाधिक साठे याच भागात आढळतात. भारताची इंधन तेलावरील निर्भरता कमी करून नैसर्गिक वायूचे वापर वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. यादृष्टीने इंधन आणि वायूचे साठे असलेल्या भागात संशोधन व उत्खननाला वेग देण्यात आला आहे.
तिनसुखिया पेट्रोलियम मायनिंग लीज (पीएमएल) क्षेत्रात दिंजन -१ विहरीमध्ये हायड्रोकार्बन मिश्रीत वाळू आढळून आली. याच्या तपासणीनंतर येथे हायड्रोकार्बन वायूचा मोठा साठा असल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी चाचणी केली असता दिवसाला १ लाख १५ हजार क्युबिक मीटर प्रमाणे गॅसचे उत्खनन करणे शक्य असल्याचे लक्षात आले. तिनसुखियामध्ये नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याने आसाममध्ये तेल आणि वायू उत्खननासाठी नवीन क्षेत्रे खुली होतील. या ठिकाणी सापडलेल्या नैसर्गिक वायूच्या साठ्यामुळे आजूबाजूच्या क्षेत्रात देखील नैसर्गिक वायूचे साठे असल्याची शक्यता वाढली आहे.
आसामला तेल नैसर्गिक वायू केंद्र म्हणून पुढे आणणार असल्याचे गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. देशात आढळणाऱ्या साठ्यापैकी १५ टक्के नैसर्गिक वायू आसाममध्ये आढळतो. तेल व नैसर्गिक वायू उत्पादनासाठी विहिरी खोदण्यासाठी “ओएनजीसी’कडून देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्याचवर्षी “ओएनजीसी’ने आसाममध्ये १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती.