तेल अविव/इस्लामाबाद – दहशतवादी संघटना ‘तेहरिक-ए-तालिबान’ (टीटीपी) व कट्टरपंथी गट ‘तेहरिक-ए-लबैक’ (टीएलपी) यांच्या मागण्या मान्य करून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकल्याची टीका पाकिस्तानात होत आहे. याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद उमटत आहेत. इटलीतील राजकीय विश्लेषक सर्जिओ रेस्ट्ली यांनी यावर चिंता व्यक्त करून याचे भीषण परिणाम एकट्या पाकिस्तानलाच नाही तर सार्या जगाला भोगावे लागतील, असा इशारा दिला.
काही दिवसांपूर्वीपर्यंत ‘लबैक’ ही कट्टरवादी संघटना असल्याचा आरोप करणार्या इम्रान खान यांच्या सरकारने गेल्या आठवड्यात या संघटनेशी जुळवून घेतले. तसेच टीएलपीवरील बंदी मागे घेऊन या संघटनेच्या शेकडो समर्थकांची सुटका केली. पंतप्रधान इम्रान यांच्या या निर्णयावर पाकिस्तानात संताप व्यक्त होत असतानाच टीटीपी या दहशतवादी संघटनेबरोबर महिन्याभरासाठी संघर्षबंदी केल्याचे पाकिस्तानच्या सरकारने जाहीर केले.
इम्रान खान यांच्या सरकारने घेतलेले दोन्ही निर्णय आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चिंतेची बाब ठरत आहेत, असा दावा सर्जिओ रेस्ट्ली यांनी केला. कारण टीटीपी व टीएलपीच्या कारवायांचे पडसाद पाकिस्तानच्या बाहेर देखील उमटतील, असे रेस्ट्ली म्हणाले. दहशतवादी संघटना टीटीपी अफगाणिस्तानच्या सीमेजवळील पाकिस्तानच्या भूभागात सक्रिय आहे. तर टीएलपीने पाश्चिमात्य देशांच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारली आहे, याकडे रेस्ट्ली यांनी लक्ष वेधले.
पाकिस्तानचे तत्कालिन हुकूमशहा परवेझ मुशर्रफ आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी देखील दहशतवादी व कट्टरपंथियांना वेसण घालण्याचे प्रयत्न केले होते. त्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे इम्रान खान यांच्या सरकारने टीटीपी व टीएलपीबरोबर सुरू केलेल्या चर्चेचा विशेष परिणाम होणार नसल्याचे रेस्ट्ली सुचवित आहेत. टीटीपीबरोबरच्या संघर्षबंदीसाठी पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कचा मध्यस्थीसाठी वापर करून आपल्यासमोरील समस्या अधिकच वाढविल्याचा इशारा रेस्ट्ली यांनी दिला. हक्कानी नेटवर्क ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी संघटना ठरते. त्यामुळे यावर आंतरराष्ट्रीय स्तरातून प्रतिक्रिया उमटू शकते, याकडे रेस्ट्ली यांनी लक्ष वेधले.
पंतप्रधान इम्रान खान यांनी कट्टरवादी व दहशतवाद्यांबाबत स्वीकारलेले नरमाईचे धोरण सोडून द्यावे, अन्यथा त्याचे परिणाम सहन करावे लागतील, असा इशारा याआधी पाकिस्तानच्या काही जबाबदार पत्रकारांनीही दिला होता. मात्र इम्रान खान यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते.