इटानगर – अरुणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषे’पासून (एलएसी) ८० किलोमीटर दूर असणाऱ्या ‘चंगलागाम’ भागात ‘भारत संचार निगम लिमिटेड’ने (बीएसएनएल) दोन महिन्यानंतर मोबाईल टेलिफोन सेवा सुरु केली. ‘व्हीएसएटी’ या सॅटेलाईट कम्युनिकेशन यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने ही सेवा खंडित झाली होती. ‘एलएसी’वर भारत आणि चीनमध्ये तणाव वाढलेला असताना ‘ चंगलागाम ‘ मधली संपर्क यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होणे अत्यंत महत्वाचे ठरते.
जुलै महिन्यात चंगलागाममधल्या ‘व्हीएसएटी’ यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. यामुळे या भागातली ‘टुजी’सेवा बंद झाली. पण कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे हे काम रखडले असल्याचे ‘बीएसएनएल’च्या अधिकांऱ्यानी म्हटले. अखेरीस ‘बीएसएनएल’ने नवी ‘व्हीएसएटी’ यंत्रणा उभारली आणि शुक्रवारपासून ही सेवा सुरु केली.
मोबाईल सेवा कार्यान्वित झाल्याने चंगलागामसह आजूबाजूच्या किबिथु, वॅलाँग भागातील लष्कराचे जवान आणि सर्वसामान्य ‘टुजी’ सेवेचालाभ घेत आहेत. तसेच ‘बीएसएनएल’ने इथल्या हयुलिआंगमध्ये ‘थ्रीजी ‘सेवा सुरु केली आहे. सीमा भागातील नागरिक चीनच्या हालचालींनी सूचना प्रथम सुरक्षा यंत्रणापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे हे नागरिक भारताची स्टॅटर्जीक ऍसेट ठरतात, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले होते. यापार्श्वभूमीवर १,२०० किलोमीटर सीमारेषा चीनला भिडलेल्या अरुणाचल प्रदेशमच्या सीमाभागात मोबाईल नेटवर्क सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.