लखनऊ – गेल्या दोन दिवसात उत्तर प्रदेशच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे ४३ जणांचा बळी गेला आहे. या पावसामुळे उत्तर प्रदेशमधल्या काही ऐतिहासिक पर्यटन स्थळांचे नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावर दुःख व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक साहाय्याची घोषणा केली आहे.
३० मे रोजी उत्तर प्रदेशच्या लखनऊ, मुजफ्फरनगर, मुरादाबाद, आगरा-मथुरा, हाथरस, मैनपुरी, एटा, फिरोजाबाद, औरैया, इटावा,कन्नौज, बदायू, बरेली, शाहजहांपुर, पीलीभीत,लखीमपुर, हरदोई, सीतापुर जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामध्ये काही भागात झाड कोसळून, तर विजेचा खांब पडून २० जणांचा बळी गेला. गेल्या ४८ तासात झालेल्या मुसळधार पावसाने ४३ जणांचा बळी गेला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
आग्रा येथे १२४ किलोमीटर वेगाने आलेल्या चक्रीवादळात ताजमहलसह काही ऐतिहासिक पर्यटन स्थळांचे नुकसान झाले आहे. लखनऊमध्येही घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण ठार झाले, तर दुसऱ्या घटनेत सहाजण गंभीर जखमी झाले. तसेच वीज कोसळून उन्नावमध्ये पाच तर कन्नोजमध्ये आठ जणांचा बळी गेला आहे. इतर नागरिकांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याची माहिती मिळाल्यानंतर उघड केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.