राज्यातील दहावीचा भूगोलाचा पेपर, नववी आणि अकरावीची परीक्षाही रद्द

मुंबई – कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे दहावीचा भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासह इयत्ता नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सुरुवातीला १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती त्यामुळे २१ मार्च रोजी होणारा भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. परंतु लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याने अखेर हा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षा महामंडळाच्या प्रचलित व विहित कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत कार्यवाही करण्यात येईल. नववी व अकरावीच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा न घेता, पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चाचण्या, प्रात्यक्षिके आणि अंतर्गत मुल्यमापन करून विद्यार्थ्यांची वर्गोन्नती करून त्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने शासनास सादर केला होता. यावर निर्णय घेऊन त्यासाठी आवश्यक त्या सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत, असेही गायकवाड यांनी सांगितले. दहावीच्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षाही देखील रद्द करण्यात आल्या आहेत. कार्यशिक्षण विषयांच्या परीक्षा २४ मार्च ते ४ एप्रिल २०२० रोजी होणार होत्या. या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या विषयांच्या परीक्षा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात.

leave a reply