नवी दिल्ली – अफगाणिस्तानातील परिस्थितीबाबत विरोधी पक्षनेत्यांना माहिती देण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालयाला दिली. 26 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानातील परिस्थितीवर विशेष बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. अफगाणिस्तानातील घडामोडींचा भारताच्या सुरक्षेशी संबंध असून इथे अजूनही अडकून पडलेल्या भारतीयांच्या सुटकेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. या पार्श्वभूमीवर, अफगाणिस्तानच्या प्रश्नावरील भारताच्या भूमिकेला फार मोठे महत्त्व आले आहे.
रविवारी अफगाणिस्तानातून सुटका झालेले जवळपास चारशेजण भारतात दाखल झाले. यामध्ये भारतीय नागरिकांबरोबरच अफगाणी संसदेच्या दोन सदस्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश होता. अफगाणिस्तानातील भारतीयांबरोबरच या देशातील धार्मिक अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू व शीख समुदायाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तालिबानने हिंदू व शीख समुदायाने अफगाणिस्तान सोडून जाण्याची गरज नाही, असे सांगून त्यांना भारतात येण्यापासून रोखले होते. यातील काहीजणांना तालिबानने दहशतीखाली ठेवल्याच्या बातम्या येत आहेत.
या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्रालयाला अफगाणिस्तानातील घडामोडींबाबत विरोधी पक्षनेत्यांना माहिती देण्याची सूचना केली. परराष्ट्रमंत्री जयशंकर 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता याबाबतचे तपशील विरोधी पक्षनेत्यांना देणार आहेत. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबतची माहिती दिली. आत्तापर्यंत भारताने 730 जणांची अफगाणिस्तानातून सुटका केलेली आहे. यामध्ये भारतीय नागरिकांबरोबरच अफगाणिस्तानातील हिंदू व शीख समुदायाच्या काहीजणांचा समावेश आहे.
अफगाणी संसदेचे सदस्य असलेल्या नरेंदर सिंग खालसा यांचाही यात समावेश असून त्यांनी अफगाणिस्तानात अजूनही अडकून पडलेल्या हिंदू व शीखधर्मियांची लवकरात लवकर सुटका करण्याचे आवाहन भारत सरकारला केले आहे. कित्येक पिढ्यांपासून अफगाणिस्तानात वास्तव्य असले तरी या देशातील हिंदू व शिखांकडे हिंदुस्तानी म्हणूनच पाहिले जाते, असे खालसा यांनी म्हटले आहे.