कोलकाता – पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या १३ बांगलादेशींना सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी अटक केली. हे बांगलादेशी अवैधरित्या गेली काही वर्ष भारतातच राहत होते. काही दिवसांपूर्वी हे सर्व आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतातून बांगलादेशात गेले आणि तेथून पुन्हा घुसखोरी करून पुन्हा परतत असताना त्यांना अटक झाल्याचे समोर येत आहे.
अटक करण्यात आलेले बांगलादेशी हकीमपूर, तारळी आणि बेथारी येथील सीमेवरून घुसखोरीचे प्रयत्न करत असताना या सर्वांना अटक करण्यात आली. बीएसएफच्या ११२ व्या बटालियनच्या जवानांनी या बांगलादेशींना अटक केल्याचे शनिवारी बीएसएफने सांगण्यात आले. अटक झाल्यानंतर या सर्वानी चौकशीत आपण बांगलादेशी असल्याचे कबूल केले आहे.
मुख्य म्हणजे हे सर्व मागील काही वर्षांपासून भारतातच राहत होते. नोकरीच्या शोधात भारतात प्रवेश केल्यावर काही बांगलादेशी कोलकाता आणि काही बांगलादेशी बंगळुरूमध्ये नोकरी करत होते. आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी हे सर्व पुन्हा बांगलादेशमध्ये अवैधरित्या सीमा पार करून गेले होते. नातेवाईकांना भेटून भारतात येत असताना त्यांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुढील कारवाईसाठी पकडण्यात आलेल्या या बागलादेशींना बीएसएफने स्वरूपनगर पोलिसांकडे सुपूर्द केले असून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीएसएफच्या दक्षिण बंगाल फ्रंटियरकडून भारत-बांगलादेश सीमेवर अवैध घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे अवैध घुसखोरीला बऱ्याच प्रमाणात आळा बसला आहे, असे सीमासुरक्षा दलाचा अधिकाऱ्यांनी सांगितले. घुसखोरी आणि तस्करीच्या घटना रोखण्यासाठी भारत आणि बांगलादेशच्या जवानांकडून संयुक्तरित्या गस्त देखील घालण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्यात बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशच्या सीमासुरक्षादलाकडे आठ बांगलादेशी नागरिकांना सुपूर्द केले होते.