नवी दिल्ली – दोन दिवस उलटल्यानंतरही गलवान व्हॅलीतील भ्याड हल्ल्यात आपले किती जवान शहिद झाले ते चीनने स्पष्ट केलेले नाही. जनभावना भडकू नये यासाठी आपण बळी गेलेल्या जवानांची संख्या जाहिर करत नसल्याचे चीनचे म्हणणे आहे. परंतु भारतीय लष्कराच्या प्रत्युतरात आपल्याला अधिक संख्येने जवान गमवावे लागले हे मान्य करून चीन आपली नाचक्की करून घ्यायला तयार नसल्याचे समोर येत आहे. गलवान व्हॅलितील चीनच्या हल्ल्यात भारताच्या कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहिद झाले होते. भारताने यासंदर्भात पारदर्शकता दाखवून याबाबतची सारी माहिती उघड केली. पण चीन या संदर्भात करित असलेली लपवा छपवी या देशाची मानसिकता उघड करित आहे. त्याचवेळी भारतीय लष्कर या हल्ल्याच्या सूडादाखल जबरदस्त लष्करी कारवाई करील या चिंतने ग्रासलेल्या चीनने गलवान व्हॅलित अधिक सैनिकांची तैनाती करून इथे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे ही तैनात केली आहे.
भारत सरकारने आपल्या लष्कराला चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्वाधिकार बहाल केले आहे. यापुढे चीनी लष्कराने जराही आगळीक केली तरीही पूर्ण शक्तिनीशी प्रहार करण्यासाठी भारतीय लष्कर आसुसलेले आहे. लडाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या चीनच्या सिमेवर भारतीय लष्कराची तयारी पूर्ण झाली असून वासुसेनेची विमाने सुसज्ज्ज स्थितीत ठेवण्यात आली आहे. भारतीय नौदल कुठल्याही क्षणी मलाक्काच्या आखातात चीनची कोंडी करू शकते याची वेगवेगळ्या मार्गाने चीनला जाणीव करून दिली जात आहे. याचे परिणाम दिसू लागले असून अस्वस्थ बनलेला चीन भारताला युद्धाच्या नव्या धमक्या देऊ लागला आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांनी आपल्याला लष्कराला अत्याधुनिक होण्याचा आणि अधिक व्यावसायिकता दाखविण्याचा संदेश दिला आहे. भारताबरोबरील तणाव प्रचंड वाढला असताना चीनी राष्ट्राध्यक्षांनी केलेली ही विधाने लक्षवेधी ठरतात. लोखंडी सळ्या व काटेरी तारा यांचा वापर करून हल्ला चढविणारे चीनचे लष्कर म्हणजे ‘प्रोफेशनल आर्मी’ नाही. जगातील कुठलेही लष्कर अशा स्वरुपाचे वर्तन करित नाही अशी टिका भारताचे माजी लष्करी अधिकारी करित आहेत. थेट युद्ध करण्याची धमक नसल्यानेच चीनी जवानांनी गोळीबार न करता भारतीय सैनिकांवर लोखंडी सळ्या व काटेरी तारांचा वापर करून हल्ला चढविला. यामुद्याकडे माजी लष्करी अधिकारी लक्ष वेधत आहेत.
चीन कितीही मोठे दावे ठोकत असला तरी प्रत्यक्षात लढताना चीनचे जवान कसलेल्या भारतीय लष्करासमोर किती काळ टिकाव धरू शकतील हा प्रश्नच आहे असा दावा एका माजी लष्करी अधिकाऱ्याने केला आहे. चीन नामक देशाशी नाहितर चीनवर सत्ता गाजविणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाशी निष्ठा सांगणारे चीनचे जवान प्राणपणाने लढू शकत नाही. या मुद्याकडे सामरिक विश्लेषक लक्ष वेधत आहे. ‘सीएनएन’ या अमेरिकी वृत्तवाहिनीमध्ये प्रसिध्द झालेल्या एका लेखात चीन लष्करी दृष्ट्या भारतापेक्षा वरचढ आहे असे मानण्याचे काहिच कारण नाही असे बजावण्यात आले आहे. म्हणूनच भारताने प्रतिहल्ल्याची भाषा सोडून द्यावी अशा धमक्या चीनकडून दिल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात भारताच्या कारवाईच्या धास्तीने चीन बेचैन झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचवेळी भारतीय लष्कराचा आत्मविश्वास दृढावल्याचे दिसत असून चीनवर वाढलेल्या दडपणामुळे भारतीय संरक्षण दलांच्या हालचाली अधिकाधिक तीव्र होत चालल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.