सुदानच्या दर्फूरमधील वांशिक संघर्षात 125 जणांचा बळी

खार्तुम – सुदानच्या वेस्ट दर्फूर प्रांतात झालेल्या वांशिक संघर्षात 125 हून अधिक जणांचा बळी गेला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. कुल्बुस शहरात जमिनीच्या हक्कावरून पेटलेल्या वादानंतर अरब बंडखोर गटांनी नजिकच्या गावांवर जोरदार हल्ले चढविले. यावेळी जवळपास 20 गावांमध्ये जाळपोळ झाली असून या भागातील 50 हजार नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ ओढावली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने मंगळवारी ही माहिती दिली. गेल्या सहा महिन्यात दर्फूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वांशिक संघर्ष भडकण्याची ही तुिसरी वेळ आहे.

गेल्या आठवड्यात वेस्ट दर्फूर प्रांतातील कुल्बुसमध्ये जमिनीचा वाद भडकला होता. अरब व स्थानिक आफ्रिकी नागरिकांमध्ये भडकलेल्या या वादाचे रुपांतर वांशिक संघर्षात झाले. ‘अरब जंजावीद’ बंडखोरांच्या गटाने कुल्बुसच्या नजिक असलेल्या स्थानिक जमातींच्या गावांवर हल्ले चढविले. यावेळी तब्बल 20 गावांमध्ये घरे व इतर मालमत्तांची जाळपोळ करण्यात आली. जळालेली घरे व मालमत्तांमधून 60हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले.

संघर्षात अनेक जण बेपत्ता तसेच गंभीर जखमी असून बळींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हल्लेखोर गटांनी या भागातील पाण्याचे स्रोत व इतर काही भागांवर ताबा मिळविल्याची माहिती स्थानिक नेत्यांनी दिली. या हिंसाचारानंतर कुल्बुस व नजिकच्या भागात अतिरिक्त लष्कर तैनात करण्यात आले आहे. मात्र स्थानिक गट व स्वयंसेवी संस्थांनी या भागात ‘जॉईंट न्यूट्रल फोर्सेस’ तैनात करण्याची मागणी केली आहे.

एप्रिल महिन्यात वेस्ट दर्फूरमधील क्रेनिक भागातील गावांमध्ये भडकलेल्या हिंसाचारात 168 जणांचा बळी गेला होता. गेल्या दोन वर्षात दर्फूरमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे दिसत आहे. वांशिक संघर्ष व हिंसाचाराच्या या नव्या घटना 2003 साली भडकलेल्या संघर्षाशी साधर्म्य दाखविणाऱ्या आहेत, असा दावा करण्यात येतो.

पाणी, शेती व जमिनीच्या मुद्यावरून स्थानिक आफ्रिकी व अरबवंशियांमध्ये 2003 साली मोठा संघर्ष उडाला होता. त्यावेळी सुदानमध्ये हुकुमशहा ओमर बशिर यांची राजवट होती. बशिर यांनी अरब गटांना पाठिंबा देऊन आफ्रिकीवंशियांचा संहार सुरू केला होता. 2020 साली बशिर यांची राजवट उलथून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे.

दर्फूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी 2007 साली संयुक्त राष्ट्रसंघटनेने शांतीसेना तैनात केली होती. मात्र त्यानंतरही हिंसाचारात विशेष फरक पडलेला नाही, उलट शांतीसेनेवरच हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. जवळपास 15 वर्षे हा भीषण संघर्ष सुरू होता. यात तीन लाखांहून अधिक जणांचा बळी गेला असून 25 लाखांहून अधिक जण विस्थापित झाले आहेत.

दर्फूर भागात तैनात केलेल्या शांतीसेनेची मुदत 2020 सालच्या अखेरीस संपली असून या भागात आता सुदानी लष्कर तैनात करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर दर्फूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात लष्कराला अपयश आल्याचे दिसत आहे. नव्या घटनांमध्ये ‘अरब जंजावीद’ बंडखोर गटांचा हात असणे ही बाब सुदानमधील लष्करी राजवटीसाठी धोक्याचे संकेत ठरतात. अरब जंजावीद गटांना काही देशांचे समर्थन असल्याचे मानले जाते. त्यामुळे हे गट व त्यांच्याकडून घडविण्यात येणारा हिंसाचार सुदानमध्ये नव्या अस्थैर्याला कारणीभूत ठरु शकतो, अशी चिंता विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply