नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे मूळ गावी परतलेल्या स्थलांतरित मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ राबविण्यात येणार आहे. सहा राज्यातील ११६ जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येणार असून ५० हजार कोटी रुपयांची सार्वजनिक कामे केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे लाखो मजूर आपल्या मूळ गावी परतले असून त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करण्यासाठी ‘गरीब कल्याण रोजगार अभियाना’ राबवण्यात येणार असून २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या अभियानाचे उदघाट्न करण्यात येईल, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी जाहीर केले.
बिहारच्या ‘तेलिहार, गट- बेलदौर, जिल्हा- खगारियामांडून या अभियानाची सुरुवात करण्यात आहे. बिहारसह झारखंड, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, ओदिशा, राजस्थान या राज्यात मोठ्या संख्येने स्थलांतरीत मजूर परतले आहेत. त्यामुळे या सहा राज्यातील ११६ जिल्ह्यांत ही योजना हाती घेण्यात येणार आहे. गरीब कल्याण रोजगार अभियानातंर्गत २५ कामांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी ५० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेसाठी जिल्ह्यांत परतलेल्या स्थलांतरित कामगारांच्या विशिष्ट कौशल्यांची तपशीलवार नोंद केंद्र व राज्य सरकारकडून करण्यात आली होती. ११६ जिल्ह्यांत ही २५ कामे १२५ दिवसांत पूर्ण केली जातील. यासाठी स्थलांतरित मजुरांना व ग्रामीण जनतेला काम उपलब्ध करुन देण्यात येईल असे सीतारामन म्हणाल्या.