नवी दिल्ली – कोरोनाचे आता मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. त्यामुळे या आता ग्रामीण भागाकडे अधिक लक्ष्य पुरवा. ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा अपुर्या असून अशा परिस्थितीत आशा आणि अंगणवाडी कर्मचार्यांच्या सहाय्याने घराघरात चाचण्या आणि तपासणीवर भर देण्यात यावा, अशा सूचना पंतप्रधानांनी राज्यांना केल्या आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत यादृष्टीने व्यूहरचना तयार करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
पहिल्या लाटेत ग्रामीण भागात तितकासा संसर्ग पसरला नव्हता. मात्र आता ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत असल्याचे आकडेवारी येत आहे. यामुळे मोठे आव्हान आहे. शहरी भागांकडून आता ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा विकसित करण्यासाठी लक्ष पुरवायला हवे. ग्रामीण क्षेत्राशी जोडलेल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कसा होईल याकडे लक्ष पुरवा अशा सूचना पंतप्रधानांनी एका उच्चस्तरीय बैठकीत अधिकार्यांना दिल्या.
ग्रामीण भागातील आरोग्य सेवकांना उपकरणे हाताळण्यासाठी तयार करा. त्यांना यासाठी प्रशिक्षित करता. ग्रामीण क्षेत्रात आवश्यक वैद्यकीय साधनांचा व औषधांचा पुरवठा सुरळीत राहिल याकडे लक्ष द्या. यासाठी व्यूहरचना आखण्याची गरज आहे. आशा आणि अंगणवाडी कर्मचार्यांना आवश्यक ते बळ पुरवा. त्यांना आवश्यक ती साधने द्या. त्यांना हाताशी धरून ग्रामीण भागात चाचण्या वाढवा. ज्या भागात अधिक रुग्ण आढळत आहेत त्या भागाकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
या बैठकीत पंतप्रधानांनी राज्यांना पुरविण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सच्या वापराबाबतचे ऑडीट करण्याच्याही सूचना केल्या आहेत. यावेळी पंतप्रधानांना राज्य आणि जिल्ह्यानुरूप कोरोना चाचण्यांची स्थिती काय आहे, याची माहिती देण्यात आली. यावेळी ऑक्सिजनचा पुरवठा, आरोग्य सुविधा आणि लसीकरणाचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला.