जीनिव्हा/तेहरान – इराणमध्ये 1988 साली घडविण्यात आलेल्या सामूहिक हत्याकांड प्रकरणी सध्या इराणचे राष्ट्राध्यक्ष नियुक्त असणार्या इब्राहिम रईसी यांची चौकशी करावी, अशी मागणी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या मानवाधिकार आयोगात ‘इन्व्हेस्टिगेटर’ म्हणून काम करणार्या जावेद रहमान यांनी ही मागणी करतानाच हत्याकांडात बळी पडलेल्यांची थडगी नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही केला. रहमान यांच्या मागणीमुळे इराणची राजवट अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संयुक्त राष्ट्रसंघटनेत ‘इन्व्हेस्टिगेटर’ म्हणून काम करणार्या जावेद रहमान यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रईसी यांच्या चौकशीची मागणी केली. ‘गेली अनेक वर्षे मी व माझ्या कार्यालयाने मुलाखती तसेच इतर माध्यमांमधून पुरावे गोळा केले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघटनेचा मानवाधिकार आयोग अथवा इतर कोणतीही यंत्रणा निष्पक्ष चौकशी करणार असेल, तर मी हे सर्व पुरावे त्यांना द्यायला तयार आहे. 1988 साली झालेल्या हत्याकांडातील विविध लोकांच्या भूमिका तपासण्याची गरज आहे. रईसी राष्ट्राध्यक्ष नियुक्त असतानाच ही प्रक्रिया होणे महत्त्वाचे आहे. मला वाटते हीच योग्य वेळ आहे’, असे रहमान यांनी म्हटले आहे.
अशा प्रकारची चौकशी इराणच्याच हिताची असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या अधिकार्यांनी केला. राष्ट्राध्यक्ष नियुक्त रईसी यांची त्या हत्याकांडात महत्त्वाची भूमिका होती, असा दावाही त्यांनी केला. 1988 साली इराणचे तकालिन सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्लाह खोमेनी यांच्या निर्देशांवरून हजारो लोकांची हत्या घडविण्यात आली होती. रईसी त्या काळात राजधानी तेहरानमध्ये न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनेक जणांच्या हत्येचे आदेश दिले होते, असे मानले जाते.
रहमान यांनी रईसो यांच्या चौकशीची मागणी करतानाच हत्याकांडातील बळींची थडगी नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही केला आहे. आपल्या कार्यालयाने इराणशी यासंदर्भात संपर्क साधल्याचेही सांगितले. या मुद्यावर आपली मोहीम यापुढेही सुरू राहिल, असेही रहमान यांनी मुलाखतीत म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष नियुक्त रईसी यांनी, 1988 सालच्या घटनांचे समर्थन केले असून न्यायाधीश म्हणून जनतेच्या सुरक्षेसाठी घेण्यात येणार्या निर्णयांबद्दल खरेतर धन्यवाद द्यायला हवेत, असे वक्तव्य केले आहे. विविध मानवाधिकार संघटनांच्या अहवालानुसार 1988 सालच्या हत्याकांडात पाच हजारांहून अधिक जणांचा बळी गेला होता.